दूतावासाने भारतीय विद्यार्थी अन् नागरिकांना केले सतर्क
वृत्तसंस्था / कीव्ह
युक्रेनवर रशियाच्या आक्रमणाचा धोका सातत्याने वाढत चालला आहे. या पार्श्वभूमीवर युक्रेनमधील भारतीय दूतावासाने भारतीय विद्यार्थ्यांना मायदेशी परतण्याची सूचना केली आहे. तसेच युक्रेनमध्ये राहत असलेल्या भारतीय नागरिकांना दूतावासासोबत संपर्कात राहण्यास सांगण्यात आले आहे. रशियाचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन हे कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय युक्रनेवर हल्ल्याचा आदेश देतील आणि तो कुठल्याही क्षणी होऊ शकतो असे बोलले जात आहे. युक्रेनचे अध्यक्ष ब्लादिमीर जेलेंस्की यांनीच 16 फेब्रुवारी हा हल्ल्याचा दिवस ठरणार असल्याचे म्हटले आहे. तणावामुळे अमेरिका, ब्रिटन, नॉर्वे, जपान, लातविया आणि डेन्मार्कने पूर्वीच स्वतःच्या नागरिकांना युक्रेन सोडण्यास सांगितले आहे. युक्रेनमध्ये भारताचे 20 हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
युक्रेनमधील सद्यस्थिती पाहता युक्रेनमध्ये राहणारे भारतीय नागरिक, विशेषकरून विद्यार्थ्यांनी तात्पुरत्या स्वरुपात येथून बाहेर पडावे. भारतीय नागरिकांना अनावश्यक कारणासाठी युक्रेनचा प्रवास करणे टाळावे. युक्रेनमधील स्थितीबद्दल वेळोवेळी माहिती देत राहणार असल्याचे भारतीय दूतावासाकडू म्हटले गेले आहे.
दूतावासाचे कामकाज सुरूच राहणार
युक्रेनमध्ये भारतीय नागरिकांना सर्व सुविधा पुरविण्यासाठी दूतावास स्वतःचे कामकाज सुरूच ठेवणार आहे. रशियाच्या हल्ल्याचा धोका पाहता अमेरिकेने स्वतःचा दूतावास कीव्ह शहरातून हटवून युक्रेनमधील लवीव शहरात हलविला आहे. रशियाच्या हल्ल्याच्या भीतीने दूतावास हलविण्याचा निर्णय घेतल्याचे अमेरिकेचे विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेन यांनी म्हटले आहे.
2 हजार विद्यार्थी अडकून पडले
भारतीय विद्यार्थ्यांनी आपण घाबरलो असून मायदेशी परतू असल्याचे म्हटले आहे. विमानाचा तिकीटदर 3 पटीपेक्षा अधिक झाला आहे. 70 हजार रुपये दर असलेले तिकीट आता 2 लाख रुपयांच्या नजीक पोहोचल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. खारकीव्ह नॅशनल मेडिकल युनिव्हर्सिटीतच भारताचे 2 हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहे. ही शैक्षणिक संस्था रशियाच्या सीमेपासून केवळ 35 किलोमीटर अंतरावर असल्याने विद्यार्थी धास्तावले आहेत. युक्रेनमध्ये भारताचे सुमारे 20 हजार विद्यार्थी इंजिनियरिंग आणि वैद्यकीय शिक्षण घेत आहेत. यातील बहुतांश जण आंध्रप्रदेश, तेलंगणा, केरळ, पंजाब आणि राजस्थानमधील आहेत.
कीव्हवर हल्ला करणार रशिया
पुतीन हे कुठल्याही पूर्वसूचनेशिवाय युक्रेनवर आक्रमणाचा आदेश देतील असा दावा करण्यात येतोय. परंतु ब्रिटन आणि अमेरिकेने शांततेची अपेक्षा अद्याप कायम असल्याचे नमूद करत कूटनीतिचा मार्ग अजून खुला असल्याचे सांगितले आहे. तर एका पाश्चामत्य गुप्तचर अहवालामुळे चिंता वाढली आहे. या अहवालात अनेक हल्ल्यांचा अनुमान व्यक्त करण्यात आला आहे. याचा अर्थ रशिया सातत्याने हल्ले करून सर्वप्रथम कीव्हवर कब्जा करण्याची शक्यता आहे.
भारताची स्थितीवर नजर
युक्रेनमधील बिघडत्या स्थितीवर भारताची करडी नजर आहे. पुढील 24 तासांमध्ये युद्ध पेटण्याची चिन्हे दिसून येत आहेत. रशिया आणि युक्रेनमधील वाढता तणाव पाहता भारताने स्वतःच्या नागरिकांना राजधानी कीव्हमधून बाहेर पडण्यास सांगितले आहे. युक्रेन-रशिया तणावात भारताने आतापर्यंत उघडपणे कुणाचीच बाजू घेतलेली नाही. तर युक्रेनच्या बाजूने अमेरिकेने उडी घेतल्याने जग दोन ध्रूवांमध्ये विभागले गेले आहे. अशा स्थितीत भारत अमेरिका किंवा रशिया यापैकी कुठल्याच गटात दिसून येऊ इच्छित नाही.
भारताची कसरत
सध्या या संकटावर भारताची भूमिका अत्यंत संतुलित राहिली आहे. अमेरिका आणि रशिया यांच्यादरम्यान भारताने संतुलन राखले आहे. युक्रेन संकटावर चर्चा करण्यासाठीच्या बैठकीपूर्वी भारताने संयुक्त सुरक्षा परिषदेत एका प्रक्रियेसंबंधी मतदानापासून स्वतःला वेगळे केले. रशिया आणि चीनने बैठक बोलाविण्याच्या प्रस्तावावर मतदान केले. भारताने मतदानात भाग घेतला नाही. भारतासाठी रशिया विश्वासू सामरिक भागीदार आहे. तर अमेरिकेसोबतचे संबंध सुधारत असल्याने त्यालाही नाराज करता येत नाही.
रशियाच्या संरक्षण विभागाचे वक्तव्य
रशियाच्या सैन्य तुकडींना स्थायी तैनात असलेल्या ठिकाणांवर परत पाठविण्यास सुरुवात केल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते इगोर कोनाशेनकोव्ह यांनी केला आहे. अन्य भागांमधील युद्धसराव सुरुच राहणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. रशियाचे 1 लाख 30 हजार सैनिक युक्रेनच्या सीमेवर पोहोचले होते.
रशिया-युक्रेन तणावाचे कारण
रशियाने युक्रेनच्या सीमेवर 1 लाखाहून अधिक सैनिकांना तैनात केले आहे. यामुळे या क्षेत्रात युद्धाची भीती निर्माण झाली आहे. युक्रेनला नाटोमध्ये सामील न करण्याची मागणी रशियाने केली आहे. तसेच या क्षेत्रात नाटोकडून शस्त्रास्त्रs तैनात करण्यात येऊ नयेत असे रशियाचे म्हणणे आहे. युक्रेन नाटोत सामील झाल्यास अमेरिकेचे सैन्य आपल्या सीमेनजीक पोहोचण्याची भीती रशियाला सतावत आहे.