ऑनलाईन टीम / पुणे :
फोन टॅपिंग प्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांचा पाय आणखी खोलात जाण्याची शक्यता आहे. राजकीय नेत्यांच्या फोन टॅपिंग प्रकरणाची सखोल चौकशी केली जात असून, राज्य सरकारने यासाठी स्थापन केलेल्या समितीने शुक्ला यांना दोषी ठरवले आहे.
शुक्ला यांनी चुकीच्या पद्धतीने फोन टॅप केल्याचे या समितीच्या अहवालात म्हटलं आहे. त्यामुळेच त्यांच्याविरोधात कायदेशीर प्रक्रिया करण्यात आली आहे. रश्मी शुक्ला यांनी फोन टॅप करत असताना नेत्यांना गुन्हेगारांचे ‘कोडनेम’ दिले होते. त्यानंतर त्यांचे फोन टँपिंग केल्याचं पोलीस तपासात पुढे आले आहे. नाना पटोले, बच्चू कडू, वर्षा गायकवाड यांना त्यांनी गुन्हेगारांची नावं दिली होती. त्यांच्या नावामार्फत फोन टँपिंग केल्याची माहिती उघड झाली आहे. गुन्हेगारांची नावं कोणी द्यायला लावली आणि का दिली? याचा तपास आता पुणे पोलिसांकडून केला जाणार आहे. त्यामुळे शुक्ला यांच्या अडचणी वाढणार आहेत.