बेळगाव / प्रतिनिधी
शहरातील कचऱयाची उचल वेळेवर केली जाते. मात्र, तोच कचरा घंटागाडीतून तुरमुरी कचरा डेपोकडे घेऊन जाताना व्यवस्थित न नेल्यामुळे किंवा गाडीमधील कचरा ओव्हरफ्लो झाल्याने सर्व कचरा रस्त्यावर पडत आहे. त्यामुळे मागून जाणाऱया वाहनधारकांना रस्त्यामध्ये पडलेल्या कचऱयातूनच मार्ग काढावा लागत आहे, ही बाब नित्याचीच झाली आहे.
विजयनगर ते हिंडलगा या मार्गावरून मंगळवारी दुपारी बारा ते एकच्या सुमारास कचरा वाहून नेणारे वाहन जात असताना त्यातून कचरा रस्त्यावर पडला. त्यामुळे येथील एक किलोमीटर रस्त्यावर कचऱयाचे साम्राज्य पसरलेले पाहायला मिळत होते.
शहरातील सर्व कचरा गोळा करून तुरमुरी कचरा डेपोत टाकण्यात येतो. त्यामुळे रोज महानगरपालिकेची घंटागाडी सर्व कचरा घेऊन जात असते. यामध्ये ओल्या व सुक्या कचऱयाचाही समावेश असतो. मात्र जोराच्या वाऱयाने किंवा गाडी ओव्हरफ्लो असल्याने गाडीतील सर्व कचरा रस्त्यावर पडत असतो. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱयांनी घंटागाडीमध्ये आवश्यक तेवढाच कचरा न्यावा. जेणेकरून रस्त्यावर अशाप्रकारे कचरा पडणार नाही, अशी मागणी वाहनधारक करू लागले आहेत.