वीरभद्रनगर सातवा क्रॉस येथे कचरा टाकणाऱयांवर दंडात्मक कारवाई : आठवडय़ात पन्नास हजार रुपये दंड वसूल
प्रतिनिधी /बेळगाव
रस्त्याशेजारी कचरा टाकू नये, असे आवाहन अनेक वेळा करूनही नागरिकांची मानसिकता बदलत नाही. त्यामुळे रस्त्याशेजारी कचरा टाकणाऱयांकडून दंड वसूल करण्याचा सपाटा महापालिका प्रशासनाने चालविला आहे. त्यामुळे आठवडय़ात 50 हजार रुपये दंड वसूल केला आहे. रस्त्याशेजारील ब्लॅक स्पॉट हटविण्यासाठी कचरा हटवून सुशोभिकरण करण्यावर भर दिला आहे.
शहरात विविध खुल्या जागा आणि रस्त्याशेजारी साचणाऱया कचऱयामुळे डोकेदुखी वाढत आहे. त्यामुळे कचराकुंडय़ा हटविण्यासह कचऱयाचे ब्लॅक स्पॉट हटविण्याची मोहीम महापालिकेच्यावतीने राबविण्यात येत आहे. महांतेशनगर परिसरातील कचराकुंडी हटविल्यानंतर महापालिकेच्या स्वच्छता विभागाने आपला मोर्चा वीरभद्रनगर परिसरात वळविला आहे. या ठिकाणी कचरा साचत असल्याचे महापालिकेच्या निदर्शनास आल्याने हा परिसर स्वच्छ करण्यात आला. त्यानंतर कचरा टाकणाऱयांवर आठ दिवस नजर ठेवून दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्यामुळे वीरभद्रनगर सातवा क्रॉस परिसरात कचरा टाकण्याचे बंद झाले. त्यामुळे ब्लॅक स्पॉटच्या जागेत विविध शोभेची रोपे लावून सुशोभिकरण करण्यात आले.
शहरात रस्त्याशेजारी कचरा टाकणाऱयांची संख्या वाढत आहे. सध्या 90 टक्के नागरिक स्वच्छता कामगारांकडे कचरा देत आहेत. बाजारपेठेत साचणाऱया कचऱयाची उचल दिवसातून दोन वेळा करण्यात येत आहे. तरीदेखील काही नागरिक भंगीबोळ, रस्त्याशेजारी आणि खुल्या जागेत कचरा टाकत आहेत. अशा नागरिकांना रंगेहात पकडून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. आठवडय़ात पन्नास हजार रुपये दंड महापालिकेने वसूल केला आहे. ही कारवाई यापुढे काटेकोरपणे राबविण्यात येणार असल्याची माहिती मनपाच्या अधिकाऱयांनी दिली.