पाटगांव / वार्ताहर
रांगणा किल्ल्याचे संवर्धन निकृष्ट दर्जाचे झाले असून याबाबत झालेल्या कामाची चौकशी पुरातत्व खाताचे कार्यकारी संचालक तेजस गर्गेयांच्याकडे करणार असल्याचे खासदार संभाजी राजे यांनी स्पष्ट केले.
भुदरगड तालुक्यातील पाटगाव येथून छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यातील दुर्गम भ्रमंतीचा मोहिमेस सुरुवात केली. यावेळी त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील व सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सरहद्दीवर असणाऱ्या रांगणा गडावरील परिसराची पाहणी केली. यावेळी गडाची पाहणी करत असताना छत्रपती संभाजीराजे यांनी या किल्ल्यास दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात तरुणाईकडून पिकनिक पॉईंट म्हणून ऐतिहासिक ठिकाणांना पसंती दिली जाते आहे. इतिहासाची साक्ष देणारे हे किल्ले आता गिर्यारोहण व पर्यटन या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरत आहे.
हौशी पर्यटक व ट्रेकर्स तसेच व्यावसायिक ट्रेकिंग ग्रुप मोठ्या संख्येने किल्ल्यांना भेट देतात त्यामुळे या गडांचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास होणे गरजेचे आहे. पण काळाच्या ओघात गडांची अनेक ठिकाणी पडझड झाली. यासाठी केंद्र शासनाकडून कोट्यावधी रुपयांचा निधी मिळविण्यात यश मिळवले यामध्ये रांगणा किल्ल्यास पाच कोटीचा निधी देण्यात आला होता. पण यामध्ये रांगणा देवी मंदिर, गणेश मंदिर, निंबाळकरांचा वाडा महादेव मंदिर व आतील किरकोळ तलावांची दुरुस्ती वगळता गड संवर्धन झाले नाही.
शासनाकडून रांगणा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या ताब्यात आल्यापासून तो अखेरपर्यंत स्वराज्यात अविभाज्य भाग होता. या गडाने जो सुवर्णकाळ अनुभवलेला आहे, तो त्याला परत करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. पुरातत्व विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या गडाचे संवर्धन निकृष्ट पद्धतीचे झालेले आहे. असे आज मला पाहताक्षणी दिसून येत आहे. निसर्गाच्या सौंदर्यांची मुक्त उधळण झालेल्या या किल्ल्याला त्याचे गतवैभव मिळवून देण्यासाठी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी या किल्ल्यास भेट देणे आवश्यक आहे व त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धन करण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. या गडावर आणखी उत्खनन होणे गरजेचे आहे.
कारण अनेक तोफा या खोल दरीमध्ये कोसळल्या आहेत. त्यांचा शोध घेऊन त्यांना पुनर्स्थापित करणे हेही पुरातत्व विभागाने करणे आवश्यक आहे. त्या तोफा शोधणाऱ्या सर्व दुर्गप्रेमीचे अभिनंदन छत्रपती संभाजीराजे यांनी केले छत्रपती शिवाजी महाराजांचे फक्त नाव घेऊन राज्य करणाऱ्या लोकांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांची जिवंत स्मारक असणारे गडकिल्ले याचे संवर्धन करणाऱ्या तरुणांचा सहवास मला भावतो असे मत छत्रपती संभाजीराजे यांनी रांगणा किल्ला भेटीदरम्यान व्यक्त केले. यावेळी सचिन भांदीगरे .डॉ. नवज्योत देसाई,अवधूत पाटील, संग्राम पोपळे सुशांत पाटील सुशांत माळवी राजेंद्र पाटील पाटील शशिकांत पाटील स्वप्नील साळुंखे सचिन देसाई प्रीतम पाटील राहुल शेणवी शहाजी देसाई उपस्थित होते .