दोन दरवाजे उघडले : बेळगाव शहराची पाणी समस्या दूर
वार्ताहर/ तुडये
बेळगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱया राकसकोप जलाशय परिसरात बुधवारी संततधार पावसाने जोर दिल्याने दिवसभरात पाणीपातळीत अडीच फुटाने वाढ झाली. जलाशय तुडुंब झाल्याने पाच व सहा क्रमांकाचे वेस्टवेअरचे दरवाजे सहा इंचांनी उघडण्यात आले आहेत. बेळगाव शहराला पाणी पुरवठय़ाबाबतची समस्या आता दूर झाली आहे. जलाशयाचे दोन दरवाजे उघडल्याने मार्कंडेय नदीला पुराचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
मंगळवारी सकाळी जलाशयाची पाणीपातळी 2471.40 फूट होती. दिवसभर झालेल्या पावसाने पाणी पातळीत दोन फुटाने वाढ होत बुधवारी सकाळी पाणीपातळी 2473.60 फूट इतकी झाली. यावषीचा सर्वात जादा 117.8 मि. मी. पाऊस नोंद झाला. या परिसरात आतापर्यंत एकूण 1187.3 मि. मी. पाऊस झाला आहे.
बुधवारी दिवसभर तुडये, मळवी, बेटगेरी, इनाम बडस, मोरब, बाकमूर या जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसामुळे जांभूळ ओहोळ नाल्यासह सर्वच नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. पाण्याचा प्रचंड ओघ जलाशयाला येऊन मिळत असल्याने दुपारी जलाशयाचे दोन दरवाजे उघडण्याचा निर्णय शहर पाणीपुरवठा मंडळाने घेतला आहे.
दुपारपर्यंत झाली दोन फुटाने वाढ
बुधवारी सकाळी जलाशयाची पाणीपातळी 2473.60 फूट होती. दुपारी तीन वाजता ती 2476 फुटांपर्यंत वाढल्याने मागील वषीच्या 2277.50 फुटांच्या पाणी पातळीकरिता दीड फूट पाण्याची आवश्यकता होती. बुधवारी आठ तासांच्या कालावधीत पाणीपातळीत अडीच फूट वाढ झाली आहे. मागील वषी 30 जुलै रोजीच जलाशय तुडुंब भरले होते. त्यानंतर 10 ऑगस्टपर्यंत विक्रमी पावसाची नोंद झाल्याने जलाशय स्थापनेपासून प्रथमच चार दरवाजे 6 फूट ते 8 फुटांपर्यंत उघडण्यात आले होते. 1 ऑगस्ट 2019 ते 10 ऑगस्ट 2019 दरम्यान दहा दिवसांत 1421 मि. मी. पाऊस पडला होता. यामध्ये 7 ऑगस्ट रोजी 257.3 मि. मी. तर 8 ऑगस्ट रोजी 288.6 मि. मी. पाऊस झाला होता. मागील वषीच्या मानाने यावषी सर्वात जादा पाऊस बुधवारी 117.8 मि. मी. इतका नोंद झाला आहे.
मार्कंडेय नदीकाठावरील जनतेला
सतर्क राहण्याचे आवाहन
राकसकोप जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने जादाचे पाणी मार्कंडेय नदीत सोडण्यात येत आहे. यामुळे मार्कंडेय नदीपात्राला पूरमय स्थिती निर्माण होणार असल्याने ग्रामस्थांनी सतर्क राहण्याचे आवाहन कार्यकारी अभियंते चंद्राप्पा व जलाशयाचे उपअभियंते डिसुजा यांनी केले आहे.
यावषी पाणीपातळी दोन फुटाने कमी होणार
वेस्टवेअरच्या सहा दरवाजांवर वेल्डींगने पत्रे बसवत पाणीपातळी 2477.5 फुटापर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे तुडये-मळवी, इनाम बडस, बेळवट्टी येथील शेतकऱयांची जलाशय काठावरील शेकडो एकर जमिनीतील पिके नुकसानीत जात आहेत. याबाबत तुडयेतील शेतकऱयांनी तक्रार करत पाणीपातळी 2475 फुटांपर्यंतच ठेवण्याचे मत व्यक्त केले आहे. दुपारी पाणीपातळीतील वाढ पाहता येथील शेतकरी संघटक अरुण पाटील व रामचंद्र गोडसे यांनी पाणीपातळी कमी करण्याची मागणी जलाशय व्यवस्थापक लक्ष्मण कांबळे यांच्याकडे केली आहे.