जयपूर / वृत्तसंस्था
भारतीय जनता पक्षाकडून काँग्रेसचे आमदार फोडून राजस्थानातील आपले सरकार पाडण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केला आहे. सरकार पाडण्यासाठी कोटय़वधींची ऑफर दिली जात असून यामध्ये भाजप नेत्यांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याचा दावाही त्यांनी केला. राज्यात सध्या कोरोनाचा वाढता प्रसार सुरू असताना भाजपकडून छुप्या पद्धतीने राजकयी अस्थिरता निर्माण केली जात आहे. तथापि, आपले सरकार कार्यकाळ पूर्ण करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.
मुख्यमंत्री गेहलोत यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेत भाजपवर टीकास्त्र सोडले. राज्यात घोडेबाजाराला ऊत आला असून भाजप नेत्यांनी मानवतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. आम्ही जीव वाचविण्यात गुंतलो असताना भाजप नेते मात्र सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत आहेत, असे गेहलोत म्हणाले. सध्या आम्ही सर्व लक्ष कोरोनाग्रस्तांचे जीव वाचवण्यावर केंद्रीत केले आहे. परंतु, भाजपचे नेते आमचे सरकार पाडवण्यासाठी सक्रीय झाले आहेत. भाजपच्या या कारनाम्यांमुळे माझ्यासह मंत्री, आमदारांना सरकार वाचविण्यासाठी संघर्ष करावा लागत असल्याचेही त्यांनी सांगितले. तथापि, राज्यातील काँग्रेसचे सरकार स्थिर असून ते टिकून राहील आणि आपला निर्धारित कालावधी पूर्ण करेल असा, विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
भाजप नेत्यांची नावे घेऊन आरोप
सरकार पाडण्याच्या प्रयत्नात भाजपचे विधानसभेतील नेते गुलाबचंद कटारिया, उपनेते राजेंद्र राठोड आणि प्रदेश भाजप अध्यक्ष सतीश पुनिया हे प्रयत्नशील आहेत असा आरोप त्यांनी केला. भारतीय जनता पक्षाने मध्यप्रदेशसह अन्य राज्यांतील सरकारे अशाच घोडेबाजारातून पाडली आहेत. त्यांना हाच प्रयोग राजस्थानात करायचा आहे असा आरोपही त्यांनी केला. आताही राजस्थानमध्ये 25-25 कोटी रुपये आमदारांना देण्यात येत आहेत असा थेट आरोप त्यांनी केला. सतिश पूनिया, राजेंद्र राठोड हे नेते केंद्रीय नेतृत्वाच्या सांगण्यावरून आमचे सरकार पाडण्यासाठी वेगवेगळे डाव रचत आहेत. सरकार पाडण्यासाठी सध्या आमच्या आमदारांना 10-10 कोटी रुपये आणि 15 कोटी रुपये नंतर देण्याचे आमिष दाखविले जात असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.