अध्याय तेरावा
सनकदिक हे ब्रह्मदेवाचे मानसपुत्र होते त्यांनी एकदा ब्रह्मदेवाना प्रश्न केला की, संसारसागर तरून जाऊ इच्छिणाऱया मुमुक्षूने चित्त आणि विषय या एकत्र राहणाऱया दोघांना एकमेकांपासून दूर कसे ठेवावे ? विषय हे एकदा चित्तात शिरले की, तेथून कधी निघत नाहीत. कारण ते चित्ताला जखडून बसलेले असतात. मग चित्त आणि विषय यांची परस्पर संपूर्ण ताटातूट कशी घडणार ? पण ब्रह्मदेवांची बुद्धी कर्माच्या ठिकाणी आसक्त, म्हणजे कर्मफळाची अपेक्षा करणारी असल्याकारणाने पुष्कळ विचार करूनही त्यांना प्रश्नाचा आशय कळला नाही. प्रश्नाचे यथायोग्य उत्तर कसे द्यावे हे ब्रह्मदेवांच्या लक्षात आले नाही. तेव्हा भगवंतांना शरण जाऊन या प्रश्नाचे उत्तर मिळवावे म्हणून ते भगवंतांचे चिंतन करू लागले. तेव्हा भगवंतांचे मन कळवळले. कारण ब्रह्मदेव त्यांचेच अपत्य होय. त्यांच्यासाठी भगवंत हंस झाले. भगवंत म्हणाले, मी श्वेतवर्ण असून स्वयंप्रकाशच आहे. म्हणून ब्रह्मदेवाच्या पुत्रांना उपदेश करण्यासाठी स्वतः राजहंस झालो. ज्याप्रमाणे हंस दूध आणि पाणी वेगळे करतो त्याप्रमाणे मी सार आणि असार हे वेगळे करून सांगितले. वास्तविक पाहता ब्रह्मदेवाना हे माहीत होते पण सृष्टी निर्माण करण्याच्या कामात ते गुंतले असल्याने त्यांची बुद्धि जड झाली आणि आत्मज्ञानाची सिद्धि ते विसरून गेले. मी कर्माचा अधिकारी आहे असे जो म्हणतो, तो त्याच वेळी देह धारण करणारा होतो. तो परमार्थाच्या नगरात कधीच शिरावयाचा नाही. खरं म्हणजे मी ब्रह्मदेवाला उपदेश केला होता, पण शेवटी कर्मफळाच्या अपेक्षेने त्याची बुद्धी मंद झाली. जो कर्माने कर्मठ झाला आहे, त्याला मुक्ति कशी प्राप्त होणार ? ब्रह्मदेव हा त्रिभुवनात सर्वांच्या अदृष्टाचा जाणता असूनसुध्दा कर्मफळाच्या अपेक्षेने विषयी झाला. मग इतरांची अवस्था काय होत असेल ? पुत्रांच्या प्रश्नाचे उत्तर सांगताना ब्रह्मदेवाचे ज्ञानही उज्ज्वलित होईल, अशी संधी साधून मीही सत्यलोकात उतरलो. हंस जसा दूध नासू न देतां त्यांतील दूध आणि पाणी वेगळे वेगळे करतो, त्याप्रमाणे सार कोणते आणि असार कोणते हे निवडण्याकरिता मी ज्ञानाने चतुर असा राजहंस आहे. मी हंसरूपाने आलेलो पाहून सर्वांना अत्यंत आश्चर्य वाटले. केवळ परब्रह्मस्वरूप अशी माझी श्रे÷ मूर्ती, हंसरूपाने येताना पाहून सर्व देव उभे राहून मला सामोरे आले आणि त्यांनी मला साष्टांग नमस्कार घातला. ब्रह्मलोकात वेद हे मूर्तिमंत असतात, तेथे पुण्यही मूर्तिमंत असते, सत्यलोकात सत्य हे मूर्तिमंत आहे सनकदिकांच्या प्रश्नाचे उत्तर म्हणून नित्यानित्यविवेकाचे ज्ञान मी त्यांना सांगितले. तेच निरूपण तूही ऐक.
उद्धवा ! तुला मी सनकादिकांप्रमाणेच मानतो हे लक्षात ठेव. म्हणूनच त्यांना जे ज्ञान सांगितले ते तुलाही सांगेन. जीवाचे कान करून उद्धव ऐकू लागला भगवंत पुढे म्हणाले, हे ज्ञान अत्यंत श्रे÷ असून जुनाट आहे. लक्ष देऊन ऐक. देवालयात रत्नाची खाण सांपडावी, त्यात परिस सांपडावा आणि त्या परिसापासून अमृताचा पाझर फुटावा, त्याप्रमाणेच उद्धवाला मोठे भाग्य प्राप्त झाले होते.
सनकादिकांचा जो वाटा, तो आपण होऊन श्रीकृष्ण उद्धवाच्या हातात देत होते, तेव्हा त्याचे भाग्य किती वर्णन करावे ? वक्ते भगवंत स्वतःच ब्रह्मस्वरूप, त्यात ते ब्रह्मकथेचाच उपदेश करणार, म्हणजेच परब्रह्मच उद्धवाचे गुरु झाले. केव्हडे उद्धवाचे महाभाग्य ! म्हणून आत्मभाग्याने भाग्यवंत व जगामध्ये अत्यंत प्रसिद्ध असा एक उद्धवच होय. ज्याच्याकरिता स्वतः ज्ञानसमर्थ असा जगन्नाथ प्रसन्न झाला. भगवंत म्हणाले, मला पाहिल्यावर तू कोण असा प्रश्न मला सनकदिकांनी विचारला त्यावर मी सांगितले की, परमात्मा सर्वत्र एकच आहे. त्यात ‘मी’ आणि ‘तू’ हे मुळी शिरतच नाही.
तुम्ही जो प्रश्न केलात, त्याला प्रत्युत्तर द्यावयाला वक्त्याला जागाच नाही. कारण, मीतूपणा म्हणून काही दिसतच नाही. हे न जाणून तुम्ही प्रश्न केलात, पण मीतूपणा हाच मुळात नाही, म्हणून तुम्ही विचारलेला प्रश्न मिथ्या आहे. नाम, रूप, वर्ण, व्यक्ति हे काहीच नाही.
क्रमशः