माजी आमदार अमल महाडिक यांचे टीकास्त्र
कोल्हापूर/प्रतिनिधी
राजाराम कारखाना आणि शेतकऱ्यासमोर अडचण निर्माण करायची व नंतर कारखान्याला त्या अडचणीतून बाहेर काढल्याचं नाटक पालकमंत्री यांनी अतिशय उत्कृष्ठपणे वठविले, त्यासाठी त्यांचे विशेष कौतुक अशी उपरोधात्मक टीका माजी आमदार कारखान्याचे संचालक अमल महाडिक यांनी केली आहे राजाराम बंधारा वरील वाहतूक बंद प्रकरणावरून पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी आमदार अमल महाडिक यांच्यात वादाची ठिणगी पडली आहे.
कोल्हापूर पाटबंधारे विभागाअंतर्गत असणाऱ्या कसबा बावडा येथील राजाराम बंधारा हा दुरूस्तीकरीता.15 डिसेंबर अखेर वाहतूकीकरीता बंद ठेवण्याचा निर्णय कार्यकारी अभियंता यांनी घेतला राजाराम कारखान्याच्या गळीत हंगामास सुरूवात झाल्यानंतरच बंधाऱ्याच्या दुरूस्तीचा निर्णय का घेतला गेला असावा ? कोल्हापूर जिल्ह्यातील इतर सर्वच बंधारे सुस्थितीत आहेत का ? त्यांची यादी त्यांनी का जाहीर केली नाही ? की फक्त निवडणूकीच्या तोंडावर ऊस वाहतूकीमध्ये अडथळा निर्माण होवून कारखाना प्रशासनाच्या अडचणींमध्ये वाढ करण्याचा यामागे काही हेतू होता ? असे बरेचसे प्रश्न या निर्णयानंतर उपस्थित झाले. आहेत असा प्रश्न कारखान्याचे संचालक माजी आमदार अमोल महाडिक यांनी उपस्थित केला आहे.
यासंदर्भात त्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, साखर कारखान्याच्या वतीने कार्यकारी संचालकांनी त्याच दिवशी निर्णय रद्द करून गळीत हंगाम संपल्यानंतर दुरूस्तीचे काम हाती घ्यावे’, अशा आशयाचे विनंती पत्र जिल्हाधिकारी, कार्यकारी अभियंता व प्रादेशिक सहसंचालक यांना दिले होते.
छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखाना व्यवस्थापनाच्या कार्यतत्परतेमुळे, शेतकऱ्यांचा रोष व्यवस्थापनावर न जाता उलट आपल्यावरच येईल या भितीने पालकमंत्री यांनी लगेच दुसऱ्या दिवशी पाटबंधारे विभागाला निर्णय रद्द करण्याचे आदेश दिले. आणि लगेच वर्तमानपत्र, मिडियाच्या माध्यमातून आपणच शेतकऱ्यांचा तारणहार असल्याचे भासविण्याचा प्रयत्न केला. पण कारखान. म्हणजे सर्वसामान्य सभासद शेतकरी अडचणीत यावा म्हणून याआधीही गाडी अड्डयाच्या जागेवर आरक्षण टाकणे, विधानसभा निवडणूकीमध्ये पराभूत झाल्यानंतर कार्यकर्त्यांकरवी कारखान्यावर दगडफेक करणे, वारंवार विस्तारीकरणास विरोध करून प्रगतीला खोडा घालणे असे उद्योग पालकमंत्री व त्यांच्या बगलबच्च्यांनी केलेले असल्यामुळे त्यांचा हा प्रयोग मात्र सपशेल फसला !
कसलेही लोकहिताचे काम न करता केवळ सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या डोळयात धुळफेक करून राजकीय फायदा उचलण्याचे तंत्र या व्यक्तीला अवगत असले तरी इथून पुढच्या काळात आम्ही सातत्याने सत्य परिस्थिती जनतेसमोर मांडत राहू व कलंकीत राजकारणाला फाटा देवून त्यांचा प्रत्येक कुटील डाव निश्चितपणे हाणून पाडू, असा इशारा महाडिक यांनी पत्रात दिला आहे