प्रतिनिधी/ सातारा
साताऱयात खासदार उदयनराजे अन् सभापती रामराजे हे दोन काही न कराताही बातमीचे विषय असतात. त्यात दोघांनी गेल्या पाच वर्षांत केलेलं कवित्व आठवलं तर काहींना उकळय़ा फुटतात तर काहींची पळताभुई थोडी होते. त्यात शनिवारी दोन्ही राजे आमने-सामने आले…. इतकंच काय, एकमेकांशी बोलले, ख्याली खुशाली विचारली ! गेल्या दोन कोजागिरी पौर्णिमेला जे अघटित झालं होतं त्यामुळे यंदाची कोजागिरी संपल्यावर या भेटी झाल्याने पोलिसांचे जीव मात्र भांडय़ात पडल्याची खुमासदार चर्चा होती.
त्याचं झालं असं,
एकाच पक्षातल्या या दोन राजांमध्ये गेल्या 5 वर्षांत मोठा राजकिय घमासान होता. दोघांनी एकमेंकांवर अत्यंत टोकाची भाषा वापरून झाली आहे. त्यातून उदयराजे राष्ट्रवादीतून बाहेर पडले अन् त्यांना लोकसभेत पराभव पत्करावा लागला. रामराजेंनाही त्यातूनच त्यांच्या मतदारसंघात राष्ट्रवादीचा खासदार निवडून आणता आला नाही. केवळ राजकियच नव्हे तर त्यापुढे जाऊनचा यांच्यात वाद असल्याने हे दोघे समोरासमोर आले तर पोलिसांची तारांबळ उडत होती किंवा जवळून गेले तरी माध्यमांत ब्रेकिंग न्युज होत होत्या.
शनिवारी सभापती रामराजे विश्रामग्रृहात अधिकारी व पत्रकारांशी चर्चा करत असताना अचानक खासदार उदयनराजेंची एन्ट्री झाली. अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला पण दोघेही शांततेच्या मुडमध्ये होते. दोघांची खुनशी नजरानजरा झाली पण त्यानंतर ‘इंग्रजीमधून टॉक’ झाले.
पाच वर्षांच्या अबोल्यानंतरचा हा टॉक काय झाला? यापेक्षा काय का होईना दोघे एकमेकांशी सन्मानाने बोलत असल्याने सोबतच्यांनी हुश्श केलं. पुढे मग ‘उभे का राहिलात, विराजमान व्हा’ अशा एकमेकांना खुणा करत दोघे आमानेसामने बसले. शाब्दीक छलकपट सोडून एकमेकांची काळजी घ्या, तब्बेतीला जपून राहा, अशा शुभेच्छा दिल्या घेतल्या.
एरवी, या दोन्ही राजांनी डोळा मारला, टीचकी वाजवली तरी रकाने भरत असतील तर शनिवारी चक्क दोघे भेटले, बसले, एकमेकांशी गोडगोड बोलले मग बातमी तर होणारच….!
आता यापुढे केवळ योगायोगाने एकत्र न येता ठरवून, पक्षभेद विसरून, जिल्हय़ाच्या सर्वांगिण विकासासाठी दोघे एकत्र आले तर सातारच्यग्ना मीडियाला सुद्धा विकासात्मक बातम्या देण्याचे सौभाग्य लाभेल, तरी आता दोन्ही राजांनी कटूता विसरून जिल्हय़ाच्या विकासाचा आराखडा एकत्रित करावा, हीच कार्यकर्त्यांची इच्छा !
राजे अन् कोजागिरी पौर्णिमा
राजे अन् कोजागिरी पौर्णिमा हे एक सूत्र गेली दोन वर्षं जमलं आहे. तीन वर्षांपूर्वी कोजागिरीला उदयनराजे व शिवेंद्रराजे यांच्यातील ‘सुरूची राडा’ राज्यभर गाजला होता तेंव्हा कित्येक कार्यकर्त्यांना दिवाळी कारागृहात काढावी लागली होती. त्यानंतर गेल्या वर्षी कोजागिरीच्या दिवशी जुना मोटर स्टँड येथे हेच दोन राजे आमने सामने आल्याने प्रचंड तणाव झाला होता. यंदा इजा-बिज-तिजा होतंय की काय अशी कार्यकर्त्यांना भिती होती त्यातच उदयनराजे आणि रामराजे एकमेकांना भेटले पण या भेटित शांतता होती त्यामुळे कार्यकर्त्यांनी पंचाग न उघडताच ‘कोजागिरी संपली रे….’चा नारा देत लवकर घर गाठलं.