नवी दिल्ली : 14 सप्टेंबर रोजी होणाऱया राज्यसभा उपसभापती पदाच्या निवडणुकीत राजद खासदार मनोज झा यांना उमेदवार म्हणून घोषित करण्याचा निर्णय सर्व विरोधी पक्षांनी गुरुवारी घेतला आहे. सर्व विरोधीपक्षांच्या नेत्यांच्या उपस्थितीत झा हे शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यांच्यासमोर संजद नेते आणि रालोआचे उमेदवार हरिवंश यांचे आव्हान असणार आहे. हरिवंश यांचा राज्यसभा उपसभापती पदाचा एक कार्यकाळ यापूर्वीच संपुष्टात आला आहे. परंतु ते पुन्हा बिहारमधून राज्यसभेवर निवडून आले आहेत. रालोआने पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी दिली आहे. यंदा बिहारमध्ये विधानसभा निवडणूक होणार असून तेथे राजद आणि संजद हेच मुख्य पक्ष असणार आहेत. राज्यसभेतील विरोधी पक्षनेते गुलाम नबी आझाद, काँग्रेसचे उपगटनेते आनंद शर्मा, राज्यसभेतील काँग्रेसचे मुख्य प्रतोद जयराम रमेश, तृणमूल, डावे, द्रमुक, आम आदमी पक्ष आणि काही अन्य विरोधी पक्षांचे नेते झा यांचा उमेदवारी अर्ज भरताना उपस्थित राहणार आहेत. राज्यसभा उपसभापती पदाच्या निवडणुकीत रालोआच्या उमेदवाराला बिनविरोध निवडून येऊ देणार नसल्याचे काँग्रेसने म्हटले होते. त्यानंतरच विरोधकांनी मनोज झा यांना संयुक्त उमेदवार म्हणून घोषित केले आहे.
Previous Articleसंरक्षण सहकार्य बळकट करणार भारत अन् जपान
Next Article दुर्मदां समरिं म्यां दमिलें
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.