जिल्हा प्रशासनांना काटेकोर अंमलबजावणीच्या सूचना
प्रतिनिधी/ बेंगळूर
राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला असून राज्य सरकारने खबरदारी म्हणून राज्य सरकारने विकेंड कर्फ्यू लागू केला आहे. त्यामुळे शुक्रवारी रात्री 10 पासून सोमवार पहाटे 5 पर्यंत कर्फ्यू जारी झाला आहे. या कालावधीत अत्यावश्यक आणि तातडीच्या सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कालावधीत अनावश्यक बाहेर पडण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. या आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनांना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे रात्री 8 पासूनच बाजारपेठेतील नागरिकांची वर्दळ कमी करण्याचे प्रयत्न सुरू झाले.
विकेंड कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जिल्हा प्रशासनांना आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याची सूचना दिल्याने प्रमुख मार्ग, फ्लायओव्हर व विविध ठिकाणी बॅरिकेड्स लावून अनावश्यकपणे फिरणाऱयांना चाप लावण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. जिल्हय़ातील परिस्थिती पाहून आणखी कठोर नियम लागू करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱयांना देण्यात आले आहेत. त्यामुळे बेंगळूर महानगरपालिका कार्यक्षेत्रात कडक निर्बंध जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे बेंगळूर शहर परिवहनची सेवा केवळ सरकारी कार्यालयीन कर्मचारी, अधिकारी, वैद्यकीय कर्मचाऱयांसाठीच सुरू ठेवण्यात आली आहे. उर्वरित जिल्हय़ांमध्ये प्रवाशांच्या संख्येनुरुप बसेस सोडल्या जाणार आहेत. त्यामुळे प्रवाशांची संख्या अत्यल्प राहण्याची शक्यता आहे. राज्यात 19 जानेवारीपर्यंत कोविड मार्गसूची जारी करण्यात आली असून या कालावधीत बसमध्ये आसन क्षमतेइतक्याच प्रवाशांना प्रवेश देण्यात येणार असली तरी मास्कचा वापर सक्तीचा करण्यात आला आहे.
शाळांसंबंधीचे निर्णय जिल्हाधिकाऱयांवर अवलंबून
शनिवारी अर्धा दिवस शाळा असून त्यांना सुटी द्यावी की नाही, याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱयांना देण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक जिल्हय़ांमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांची गैरसोय होऊ नये यासाठी शनिवारी एक दिवस सुटी देण्यात आली आहे.
विकेंड कर्फ्यूमध्ये उद्याने बंद राहणार आहेत. मात्र, कंपन्या, कारखान्यांमध्ये काम करणाऱया कर्मचाऱयांना मात्र, यातून सूट देण्यात आली आहे. त्यामुळे येथील कर्मचाऱयांना ओळखपत्र वापरून कामवर जाता येणार आहे. बेकरी, किराणा, भाजीपाला, फळेविक्री, डेअरी दूध विक्रीचे बुथ, मांसविक्री, पशूखाद्यविक्रीची दुकाने सुरू ठेवण्याची मुभा शनिवार आणि रविवारी असणार आहे. रेशनधान्य दुकानेही सुरू राहणार आहेत. हातगाडीवरून भाजीपाला-फळे विक्रीलाही परवानगी देण्यात आली आहे. जनतेची घराबाहेरील वर्दळ कमी करण्यासाठी हॉटेल- रेस्टॉरंटमधून घरपोच पार्सल पोहोचविण्याची सुविधा असणार आहे.
शनिवार आणि रविवारी हॉटेल, रेस्टॉरंट सुरू राहणार असून केवळ पार्सल नेण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, दोन दिवस मद्यविक्री बंद ठेवण्याचा आदेश असल्याने मद्यपींची निराशा झाली आहे. या कालावधीत बार आणि पब बंद राहणार आहेत.
रेल्वे आणि विमानसेवेत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे प्रवाशांना विमानतळापर्यंत जाण्यासाठी किंवा घरी परतण्यासाठी खासगी वाहन किंवा टॅक्सीचा वापर करता येणार आहे. मात्र, स्वतःजवळ प्रवासाचे तिकीट बाळगणे आवश्यक आहे.
विकेंड कर्फ्यू काळातील नियोजित विवाह समारंभांना परवानगी असली तर मोकळय़ा जागेवरील समारंभांमध्ये कमाल 200 जण तर बंदीस्त हॉलमधील विवाह कार्यक्रमातकमाल 100 जणांच्या उपस्थितीला मुभा आहे. जनतेच्या हितासाठी काही क्षेत्रांना सूट देण्यात आली आहे. मात्र, या कालावधीत नियमांचे उल्लंघन झाल्यास कारवाई करण्याचा इशारा गृहमंत्र्यांनी दिला आहे.
हॉटेल, रेस्टॉरंट बुकींग असणाऱयांना जंगल सफारीला परवानगी
हॉटेल आणि रेस्टॉरंटसंबंधी राज्य सरकारने शुक्रवारी सायंकाळी स्वतंत्र पत्रक प्रसिद्ध करून स्पष्टीकरण दिले आहे. विकेंड कर्फ्यू दिवशी हॉटेल किंवा रेस्टॉरंट बुकींग असल्याचे अधिकृत व्हाऊचर असणाऱया प्रवाशांना कोणत्याही प्रकारच्या वाहनाने प्रवास करता येणार आहे. हॉटेल, लॉज, रेस्टॉरंटमध्ये आधीच वास्तव्य असणाऱया प्रवाशांना तेथे राहण्याची किंवा तेथून घरी परतण्याची मुभा आहे. आधीच बुकींग असलेल्या केवळ या प्रवाशांनाच तेथील सर्व प्रकारच्या सुविधा पुरविण्याची मुभा रेस्टॉरंट, हॉटेलना आहे. कोरोना नियमांचे पालन करून या प्रवाशांना जंगल सफारी करण्याची अनुमती देण्यात आली आहे.