खासदार शरद पवार यांनी उडवली चंद्रकांत पाटलांची खिल्ली
प्रतिनिधी/ सातारा
राज्यात गेली दोन वर्ष महाविकास आघाडीचे सरकार स्थिर सरकार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृवाखाली राज्यात विधीमंडळामध्ये स्थिर सरकार आहे. असे असताना जर चंद्रकांत पाटील हे राष्ट्रपती राजवट लागू होणार असे म्हणत असतील तर त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. त्यांच्या वक्तव्यावर मी भाष्य करत नाही, अशा शब्दात भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांना खासदार शरद पवारांनी बेदखल करत त्यांच्या वक्तव्याची खिल्ली उडवली.
साताऱयात रयत शिक्षण संस्थेच्या छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये आयोजित कार्यक्रमानिमित्त राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष खासदार शरद पवार आले असताना पत्रकारांनी त्यांना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेल्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार यावर केलेल्या वक्तव्यावरुन छेडले असता ते म्हणाले, चंद्रकांत पाटील यांना माझ्या शुभेच्छा आहेत. राज्यात विधीमंडळामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचे सरकार स्थिर आहे. राज्यात स्थिर सरकार द्यायला उद्धव ठाकरे आणि त्यांचे सहकारी यशस्वी झाले. असे असताना विरोधक त्यामुळे अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे ते लोक अशा प्रकारची विधाने करत असतात. यापूर्वी त्यांनी अनेक विधाने केलेली आहेत. त्याची नोंद महाराष्ट्रातील सामान्य जनता घेत नाही. त्याचा फायदा होत नाही. त्याच्यावर भाष्य करत नाही, अशा शब्दात त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याची बेदखल केली.
राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी जे जे आवश्यक आहे, ते ते महाविकास आघाडी सरकारने केले आहे, असं भाजपचं म्हणणं आहे. भाजपाला यातून नेमकं काय म्हणायचं आहे, असं शरद पवारांना विचारलं असता त्यांनी काहीही बोलण्यास नकार देत ते भाजपच्याच लोकांना विचारावं लागेल, असेही पवार म्हणाले.
शरद पवारांच्या दौऱयामुळे शासकीय विश्रामगृहाला पोलीस छावणीचे स्वरुप
साताऱयात राजकीय नेत्यांच्या दौऱयावेळी प्रशासन सतर्क होते. सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्याने या सरकारमधील केणीही मंत्री व वरिष्ठ नेते मंडळींचा दौरा असेल तर प्रशासन सतर्क होते. आज शरद पवार यांच्या दौऱयाच्या अनुषंगाने शासकीय विश्रामगृहात मोठा पोलीस बंदोबस्त होता. तसेच जिल्हा न्यायालयाच्या चौकात, जिल्हा परिषद चौकात, बॉम्बे रेस्टॉरंट चौकात वाहतूक शाखेचे पोलीस दिसत होते.