हवामान खात्याचा अंदाज – किनारपट्टीवरील जिल्हय़ांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता
प्रतिनिधी/ बेंगळूर
‘यास’ चक्रीवादळामुळे नियोजित वेळेपेक्षा चार दिवस अगोदरच राज्यात मान्सून दाखल होणार आहे. हवामान खात्याने ही माहिती दिली आहे. 3 किंवा 4 जून रोजी राज्यात मान्सून दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, ‘यास’ चक्रीवादळामुळे 31 मे किंवा 1 जून रोजी मान्सून राज्यात दाखल होण्याची शक्यता वाढली आहे.
चक्रीवादळामुळे मागील आठवडय़ापासून राज्यभरात पाऊस होत आहे. 26 मे पर्यंत परिस्थिती अशीच राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. राज्यात जूनच्या सुरुवातीलाच मान्सून दाखल होणार आहे. अलिकडेच 13 जिल्हय़ांमध्ये मुसळधार पाऊस होत असल्याने कर्नाटक प्रादेशिक हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ची घोषणा केली आहे. 26 मे पर्यंत कारवार, मंगळूर, उडुपी, बेंगळूर, चिक्कमंगळूर, हासन, कोडगू, म्हैसूर, रामनगर, चिक्कबळ्ळापूर, चामराजनगर जिल्हय़ांमध्ये पाऊस होणार आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कर्नाटकाच्या मलनाड आणि किनारपट्टीवरील जिल्हय़ांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. दरम्यान, 31 मे किंवा 1 जून रोजी कर्नाटक किनारपट्टीवर मान्सून दाखल होणार असून पुढील काळात तो उत्तर कर्नाटक भागाकडे सरकरणार आहे, असे हवामान खात्याने सांगितले आहे.