काँग्रेसकडून पर्येत पर्यायी उमेदवाराचा शोध सुरू
प्रतिनिधी /पणजी
गोव्याच्या राजकीय इतिहासात प्रथमच पिता-पुत्राची आमने सामने लढत पाहण्यास मिळणार म्हणून लोकांची शिगेला पोहोचलेली उत्सुकता आता फार काळ टिकणार नाही, अशी चिन्हे दिसू लागली आहेत. दोघांमधील एका उमेदवाराने निवडणूक रिंगणातून माघार घेण्याचा विचार चालविला असल्याने लेकांचा भ्रमनिरस होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
तब्बल 11 निवडणुका लढवून त्यातील सहावेळा राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविलेले प्रतापसिंह राणे यांनी आधी यंदाही निवडणूक लढविण्याचे संकेत दिले होते. त्यातूनच काँग्रेस पक्षानेही येत्या निवडणुकीसाठी त्यांची उमेदवारी जवळजवळ निश्चित केली होती. परंतु राज्याचे बलाढय़ मंत्री असलेल्या स्वतःच्या पुत्राकडूनच त्यांना जोरदार विरोध होऊ लागला होता. तसेच आपल्या विरोधास न जुमानता वडिलांनी निवडणूक लढविलीच तर त्यांच्या विरोधात स्वतः निवडणूक लढविण्याचा इशारा विश्वजित राणे यांनी दिला होता.
या पार्श्वभूमीवर आता प्रतापसिंह राणे यांनी निवडणुकीतून माघार घेण्याचा विचार चालविला असल्याचे वृत्त आहे. त्यातूनच आपणास अजूनही अधिकृतरित्या पर्येमध्ये पक्षाची उमेदवारी जाहीर झालेली नाही, असा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षही सतर्क झाला असून पर्येत पर्यायी उमेदवाराचा शोध घेण्यास प्रारंभ केला आहे.
विश्वजित राणे यांचे पारडे जड
विश्वजित राणे हे पर्ये मतदारसंघात स्वतःची पत्नी डॉ. दिव्या राणे यांना निवडणुकीत उतरविण्याची जबरदस्त राजकीय महत्वाकांक्षा बाळगून आहेत. त्यातूनच त्यांनी वडिलांवर निवडणूक न लढविण्यासाठी दबाव आणण्यास प्रारंभ केला होता. सध्या प्रतापसिंह राणे यांनी स्वीकारलेले नरमाईचे धोरण पाहता विश्वजित यांचे पारडे जड असल्याचे दिसून येत आहे.
गेल्या दोन निवडणुकांवेळी ‘ही आपली शेवटची निवडणूक असेल’ असे जाहीर करून प्रतापसिंह राणे यांनी मतदारांकडे कौल मागितला होता. त्यात ते यशस्वीही झाले होते. त्यामुळे यंदा ते निवृत्ती जाहीर करतील असे वाटत असतानाच सत्तरीतील असंख्य कार्यकर्त्यांनी गळ घातल्यामुळे ते पुन्हा निवडणूक रिंगणात उतरण्यास तयार झाले होते. त्याशिवाय वर्ष 2022 च्या मार्च महिन्यात त्यांच्या राजकीय कारकिर्दीचे सुवर्णमहोत्सवी वर्ष पूर्ण होत असल्यामुळेही यंदाची निवडणूक त्यांच्यासाठी फारच महत्त्वाची ठरणार होती.
परंतु त्यांच्या पुत्रानेच ’आता बस्स, पुरे झाले!’, असा इशारा देत वयाची 84 वर्षे पूर्ण झाल्यामुळे राजकीय निवृत्ती स्वीकारण्याचा सल्ला दिला होता.