जनतेतून तीव्र आक्षेप घेण्यात आल्याने सरकारची माघार : कोविड मार्गसूचीचे पालन करा
प्रतिनिधी / बेंगळूर
ब्रिटन आणि इतर देशांमध्ये नव्या स्वरुपाचा कोरोना आढळून आल्यानंतर त्याचा राज्यात फैलाव होऊ नये यासाठी तज्ञांचा सल्ला घेत मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी गुरुवारपासून जानेवारी 2021 पर्यंत नाईट कर्फ्यूची (रात्रीची संचारबंदी) घोषणा केली होती. त्यासंबंधी अधिकृत आदेशही जारी करण्यात आला होता. मात्र, विरोधी पक्षांसह जनतेतून तीव्र आक्षेप घेण्यात आल्याने सरकारने अखेर हा निर्णय मागे घेतला आहे. त्यामुळे रात्रीची संचारबंदी राहणार नाही. पण, कोविड मार्गसूचीचे पालन करणे बंधनकारक राहणार आहे.
कोरोना नियंत्रणासंबंधी सल्ला घेण्यासाठी राज्य सरकारने कोविड तांत्रिक सल्लागार समितीची नेमणूक केली होती. बुधवारी या समितीच्या शिफारसींनुसार मुख्यमंत्र्यांनी रात्रीच्या संचारबंदीची घोषणा केली होती. संचारबंदीच्या वेळेत कपात करण्याची मागणी व्यावसायिक आणि उद्योजकांनी केल्यानंतर येडियुराप्पा यांनी सायंकाळी ट्विट करून 23 डिसेंबर ऐवजी 24 पासून 2 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते पहाटे 5 या कालावधीत नाईट कर्फ्यू असेल, असे स्पष्ट केले होते. त्यानुसार अधिकृत आदेशपत्रक जारी करून कोणकोणत्या क्षेत्रांवर कर्फ्यू कालावधीत निर्बंध आणि सूट राहील याची माहिती दिली होती. पोलीस खात्याला या नियमांचे पालन व्हावे, यासाठी कार्यतत्पर राहण्याची सूचनाही देण्यात आली होती.
दरम्यान, रात्रीची वर्दळ आणि व्यवहार बंद असताना नाईट कर्फ्यू जारी करून काय उपयोग होणार आहे?, असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होत होता. ख्रिसमस साजरा करण्यास परवानगी, खासगी आणि सार्वजनिक प्रवासी वाहतूक सेवेलाही सूट देण्यात आल्याने कर्फ्यूमधून काहीही निष्पन्न होणार नाही, अशी टीका करण्यात आली. सोशल मीडियावरही सरकारच्या निर्णयाची खिल्ली उडवण्यात येत होती. त्यामुळे विरोधी पक्षातील नेते आणि काही मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणून कर्फ्यू मागे घेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी गुरुवारी कर्फ्यूचा आदेश मागे घेत असल्याची घोषणा केली.
यासंबंधी पत्रक प्रसिद्ध करून त्यांनी नागरिकांनीच स्वयं निर्बंध घालून, मास्क, सामाजिक अंतराचा नियम पाळून कोरोनावर नियंत्रण आणण्यास सहकार्य करावे, घराबाहेर अनावश्यकपणे फिरणे टाळावे, असे आवाहन केले आहे.
बार-रेस्टॉरंट मालकांना दिलासा
24 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत नाईट कर्फ्यूमुळे अबकारी खात्याला 300 कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. आता कर्फ्यू रद्द करण्यात आल्याने बार-रेस्टॉरंट, पब मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नववर्षानिमित्त 31 रोजी बार, पबमध्ये पाटर्य़ांना परवानगी नसली तरी तेथे मद्यसेवनाची मुभा राहणार आहे.
ख्रिसमस साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन
ख्रिसमस आणि नववर्ष अत्यंत साधेपणाने साजरे करण्याचे आवाहन मुख्यमंत्री येडियुराप्पा यांनी केले आहे. ब्रिटनसह अनेक देशांमध्ये कोरोनाच्या नव्या स्वरुपाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून नागरिकांनी गटागटाने वावरणे टाळावे, स्वयंनिर्बंध घालून मास्क आणि सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
नियम…
- घराबाहेर अनावश्यकपणे फिरणे टाळावे
- मास्क, सामाजिक अंतराचा नियम पाळावा
- नागरिकांनी गटागटाने वावरणे टाळावे