श्रीमद भागवतमध्ये रामायण काळाचे वर्णन करताना सांगितले आहे (भा 9.10.51,52,53) त्रेतायां वर्तमानायां कालः कृतसमो।़भवत् । रामे राजनि धर्मज्ञे सर्वभूतसुखावहे । अर्थात प्रभू रामचंद्र त्रेतायुगात राजा झाले, परंतु त्यांची शासनव्यवस्था अतिशय उत्तम असल्यामुळे तो काळ सत्ययुगाप्रमाणे भासत होता. सर्वजण धार्मिक आणि सुखी होते. वनानि नद्यो गिरयो वर्षाणि द्वीपसिन्धवः। सर्वे कामदुघा आसन् प्रजानां भरतर्षभ। अर्थात ‘हे भरतवर्षभ, प्रभू रामचंद्रांच्या शासनात अरण्ये, नद्या, पर्वत, पृथ्वीचे विविध भाग, सप्तद्वीपे, सप्तसमुद्र इत्यादी सर्वांपासून प्रजेच्या सर्व आवश्यकता पूर्ण होत होत्या. नाधिव्याधिजराग्लानि दुःखशोकभयक्लमाः। मृत्युश्चानिच्छतां नासीद् रामे राजन्यधोक्षजे । अर्थात ‘पूर्ण पुरुषोत्तम भगवान श्रीरामचंद्र पृथ्वीवर राज्य करीत असताना प्रजेला शारीरिक अथवा मानसिक उपद्रव, रोग, वृद्धत्व, दुःख, शोक, क्लेश, भय यांची पीडा होत नव्हती. इतकेच नव्हे तर ज्यांना मृत्यू नको असे, त्यांना मृत्यूही येत नव्हता.’ हे वर्णन आजच्या धर्मभ्रष्ट युगात अकल्पनीय वाटत असले तरी रामायणकाळात सर्व लोक धर्माचे पालन करीत असल्याने ते अस्तित्वात होते हे सत्य आहे.
त्रेता युगामध्ये म्हणजे अंदाजे 21 लाख 65 हजार वर्षांपूर्वी शरयू नदीच्या दोन्ही तीरावरील सर्व प्रदेश कोशल राज्य नावाने परिचित होता. ही भूमी अतिशय हिरवीगार, सुखसमृद्धीने परिपूर्ण आणि धनधान्याने संपन्न होती. अशा या महान राज्यात अयोध्या नामक नगरी होती. (आजही उत्तर प्रदेशमध्ये अस्तित्वात आहे) त्याकाळी ही नगरी मनुष्यांचा राज्यकर्ता वैवस्वत मनू याच्या इच्छेनुसार बनविण्यात आली होती. ही संपन्न नगरी बारा योजन लांब आणि तीन योजन रुंद होती आणि सर्व दिशांनी सुरक्षित होती. तेथील राजपथ सुंदर आणि सरळ होते. बलवान हत्तीच्या सोंडेतून सुवासिक पाणी भरून सर्व प्रशस्त मार्गावरून शिंपडले जात असे. प्रत्येक दिवशी स्वर्गीय नृत्यांगना त्यांच्या सुशोभित विमानातून येत आणि अयोध्येवर पुष्पवृष्टी करीत असत. अयोध्येतील राजमार्गांवर संगमरवरी कमानी होत्या आणि त्या सोने, रूपे आणि मौल्यवान माणकांनी मढविलेल्या होत्या. नगराभोवती संरक्षणासाठी तट आणि मोठे खंदक होते. त्यावरून कोणतेही सैन्य आल्यास त्वरित सूचना मिळत असे. तेथील मंडई चांगली बांधलेली होती आणि अनेक मजले असलेल्या वास्तू ओळीने उभ्या होत्या. संपूर्ण नगरातून प्रभू रामचंद्रांच्या कीर्तिकथांचे गायन करीत गायक फिरत असत आणि लोककल्याणार्थ नृत्यकलाकार नृत्य करीत असत. अयोध्येत अनेक सुशोभित आणि सुगंधित अशी भरगच्च आणि आकर्षक उद्याने होती. विविध रसभरीत फळांनी बहरलेले वृक्ष होते. निळा, लाल आणि सुवर्ण रंगाच्या कमळांनी सरोवरे भरलेली होती. सुशोभित कारंजातून पाणी उंच उडविले जात होते. मंद वारा फवाऱयातील तुषाऱयाने सर्वत्र पसरून सुवासिक पाण्याचा गारवा निर्माण करीत असे. त्याच्या स्पर्शामुळे लोकांना कडक उन्हाळय़ातही वसंत ऋतूप्रमाणे वाटत असे. बदक, हंस, कोकिळ आणि मोर यांच्या मधुर वाणीने वातावरण भारलेले असे. अयोध्येतील ओढे आणि नाले यातील पाणी उसाच्या रसासमान मधुर असल्याने ते केवळ पिण्यासाठीच नव्हे तर आमराईतील आम्रवृक्षाना फळविण्यासाठी वापरीत. कित्येक घरे आणि जागा पूर्णपणे अरेखित करून बांधलेल्या असत. त्यासाठी मौल्यवान दगडांचा वापर केलेला होता आणि प्रत्येक इमारतीवर धर्मध्वज लावण्यात आले होते.
अशा या अयोध्यानगरीचे रक्षण करण्यासाठी सहस्रावधी सैनिक सज्ज असत. काही धनुष्यबाण चालविणारे तर काही शस्त्रास्त्रे जाणणारे रथी महारथी जे एकाच वेळी सहस्रावधी लोकांशी लढू शकतील असे योद्धे तेथे होते. अयोध्येकडे जाणारे मार्ग नेहमीच प्रवाशांनी गजबजलेले असत. जगातील वेगवेगळय़ा भागातून राजे आणि राजपुत्र येत आणि आपली वार्षिक करवसुली प्रामाणिकपणे अयोध्येच्या सम्राटाकडे भरत आणि आपला आदर प्रकट करीत असत. जवळचे आणि लांबून येणारे व्यापारी तेथील मंडईतून गर्दी करीत. ब्राह्मण आणि साधू नेहमीच यज्ञातून तूप अर्पण करताना दिसत. उच्च आणि सुस्वरात वेदपठण चाललेले असे. तेथे भगवान विष्णूच्या श्रुतिगाथा नेहमी गायिल्या जात. आपली इंद्रिये पूर्ण नियंत्रणात ठेवल्याने आणि परमसत्याला शरण गेल्याने तेथील ब्राह्मण अतिशय उच्च आचार विचारांचे होते, भगवद्भक्त होते. त्यांच्या दैनंदिन जीवनातील वागण्या-बोलण्यावरून हे दिसून येत असे. स्वतःच्या गरजांची पूर्तता करण्यासाठी त्यांना दिवसरात्र काबाडकष्ट करावे लागत नसत. कारण ते श्रीविष्णूची आराधना करीत आणि श्रीविष्णू त्यांना अन्न-धान्य, फळे, भाज्या तसेच सोने, चांदी, मोती आणि हिरे मुबलक प्रमाणात पुरवित असत. राज्यकारभारात सत्यवादी, प्रामाणिक, सरळमार्गी, शिस्तप्रिय असे उच्च गुणांनी परिपूर्ण असे मंत्री महाराज दशरथांना साहाय्य करीत. तसेच वेदशास्त्रसंपन्न पंडित असल्याने वेदांचे ज्ञान दैनंदिन व्यवहारात कसे वापरावे हे त्यांना माहीत होते. क्षत्रिय असल्याने ते शस्त्रास्त्रात निपुण आणि मल्लयुद्धात अद्वितीय होते. परंतु जनतेविषयी ते दयाळू असल्याने सर्व राज्यात त्यांची स्तुती होत असे. आध्यात्मिक विषयात वशि÷ आणि वामनदेव यांचा सल्ला दशरथ महाराज घेत.
ज्यावेळी लोक भगवद्भक्त असतात त्यावेळी ते मानतात की सुंदर नद्या, सुवासिक उद्याने या सर्व त्यांच्या शांती आणि सौख्यासाठीच निर्माण केलेल्या आहेत. जर आपण हरिभक्त झालो तर भगवंताच्या अस्तित्वाची आणि कृपाळूपणाची आपल्याला दैनंदिन जाणीव होतच असते. आपल्याला क्षणभरही काळजी किंवा भीती वाटत नाही. आजच्या जगातील लोक जरी शांती आणि समृद्धीची अपेक्षा करतात तरी ती कशी प्राप्त करायची हे त्यांना माहीत नाही. मतभेद नाहीसे करण्यासाठी ते शांतता परिषदेचे आयोजन करतात आणि सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी आयोग बनवितात. परंतु भगवंताकडून आणि त्यांचे प्रतिनिधी साधुसंतांकडून यश हे भगवंताचे नियम पाळल्याने प्राप्त होते हे शिकत नाहीत तोपर्यंत त्यांचे सर्व प्रयत्न फुकट जातात. श्रीइषोपनिषदमध्ये म्हटले आहे की सर्व संपत्ती भगवंताची आहे, जर आपण आपल्या उपभोगासाठी त्याच्यावर अधिकार दाखविला तर आपल्या वाटय़ाला नक्कीच दुःख येईल. केवळ भगवंताच्या इच्छेनुसार त्यांची संपत्ती त्यांच्याच सेवेत लावल्यास सगळीकडे शांती पसरेल.
सद्यस्थितीत रामराज्य म्हणजे काय आणि ते कसे येईल याचे वर्णन करताना तुकाराम महाराज म्हणतात, झाले रामराज्य काय उणे आम्हांसी । धरणी धरी पीक गायी वोळल्या म्हैशी ।।1।। राम वेळोवेळा आम्ही गाऊ ओविये । दळिता कांडितां जेविता गे बाईये ।।2।। स्वप्नीही दुःख कोणी न देखे डोळा । नामाच्या गजरे भय सुटले कळिकाळा ।।3।। तुका म्हणे रामे सुख दिले आपले । तया गर्भवासी येणे जाणे खुंटले ।।4।। अर्थात ‘रामराज्य आले आता आम्हाला काय उणे आहे? पृथ्वी भरपूर पीक देत आहे, गाई, म्हशी भरपूर दूध देत आहेत. अहो बायांनो, आता दळता कांडता आपण रामाच्या ओव्या गाऊ. रामनामाच्या गजराने कळीकाळास भय सुटले व कोणालाही स्वप्नातही दुःख प्राप्त होत नाही, असे आत्मसुख श्रीरामांनी सर्वाना दिले.
-वृंदावनदास