तालुका पंचायतमध्ये म. ए. समिती सदस्यांचा इशारा
प्रतिनिधी/ बेळगाव
अनधिकृत लाल-पिवळा झेंडा उभे करून राष्ट्रीय ध्वजाचा अवमान करण्यावर काही कन्नड संघटनांचा भर वाढला आहे. त्यामुळे आम्ही हा अपमान कधीही सहन करणार नाही. काहीजण राजकारण करून अनेक ठिकाणी जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे सरकारने हे राजकारण थांबावे, अशी मागणी करत राष्ट्रीय ध्वजाचा अवमान झाला तर आम्ही ते सहन करणार नाही, असा इशारा महाराष्ट्र एकीकरण समितीच्या तालुका पंचायत सदस्यांनी तालुका पंचायतच्या बैठकीत दिला.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका पंचायत अध्यक्ष शंकरगौडा पाटील होते. व्यासपीठावर तालुका पंचायतचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी व उपाध्यक्ष मारुती सनदी उपस्थित होते. यावेळी महापालिकेसमोर अनधिकृत उभा केलेला लाल-पिवळा हटवावा, अन्यथा महापालिकेवर भगवा फडकविला जाईल, असा इशारा देण्यात आला. काही समाज कंटकांकडून तिरंगा ध्वजाचा अवमान करण्याचा प्रकार घडला असतानादेखील जिल्हा प्रशासन मूग गिळून गप्प आहे. केंद्र सरकारने याबाबत निर्णय घेऊन तातडीने लाल-पिवळा ध्वज हटविण्यास राज्य सरकारला सूचना कराव्यात, अशी मागणी सभागृहात करण्यात आली.
तालुका पंचायत सदस्य उदय सिद्दण्णावर, सुनील अष्टेकर, नारायण नलवडे, काशिनाथ धर्मोजी, नीना काकतकर, लक्ष्मी मेत्री व इतर म. ए. समितीच्या सदस्यांनी अनधिकृतरीत्या बेकायदेशीर असलेला लाल-पिवळा ध्वज उभा करताना पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेऊन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे. महत्त्वाचे म्हणजे तिरंगा ध्वजासमोरच हा ध्वज उभा करण्यात आला आहे. त्यामुळे राष्ट्रीय ध्वजाचा अवमान होत असून यामध्ये संपूर्ण देशाचाच अवमान झाला आहे. तेव्हा त्यांच्यावर कारवाई करावी, असेही सभागृहात सांगण्यात आले.
यावेळी अध्यक्षांनी याला फाटा देण्यासाठी प्रयत्न केले. आपण सर्व तालुका पंचायत सदस्य कोणताही जातीय भेदभाव करत नसून आतापर्यंत आम्ही सर्वांनी मिळून काम केले आहे. महानगरपालिकेसमोर असलेला लाल-पिवळा हटविण्यासाठी प्रशासन कायदेशीर कारवाई करेल. त्याचा आपल्याशी काहीही संबंध नसल्याचे सांगून विषय टाळला. यामुळे नाराजी व्यक्त करण्यात आली.