वृत्तसंस्था/ मुंबई
देशातील कोरोना महामारी संकटामुळे भारतीय क्रिकेट नियंत्रण मंडळाने या वर्षीच्या राष्ट्रीय क्रिकेट हंगामात कपात करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. चालू वर्षीच्या क्रिकेट हंगामात 19 वर्षांखालील वयोगटातील विनू मंकड करंडक तसेच रणजी क्रिकेट स्पर्धा अशा केवळ दोनच स्पर्धा घेतल्या जाणार असल्याचे मंडळाच्या प्रवक्त्याने सांगितले.
संपूर्ण जगामध्ये कोरोना महामारीने थैमान घेतले असून त्याला भारतही अपवाद नाही. या धोकादायक भीषण महामारीतून बाहेर पडण्यासाठी प्रत्येक देशाचे प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक वर्षीच्या क्रिकेट हंगामात विविध वयोगटातील राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धा गेली बरीच वर्षे आपल्या देशात सातत्याने भरविल्या जातात पण यावेळी भारतीय क्रिकेट मंडळाने रणजी करंडक आणि विनू मंकड चषक अशा दोनच स्पर्धा घेण्याचे जाहीर केले आहे तर दुलीप करंडक, देवधर करंडक, विजय हजारे ट्रॉफी, 23 वर्षांखालील वयोगटाची सी.के.नायडू चषक क्रिकेट स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दरम्यान, सय्यद मुश्ताक अली टी-20 क्रिकेट स्पर्धा घेण्यासाठी भारतीय क्रिकेट मंडळ प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र रणजी करंडक स्पर्धेच्या स्वरूपात यावेळी बदल करण्यात येणार असून जुन्या पद्धतीचा अवलंब करण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी होणारे संघ उत्तर, पश्चिम, दक्षिण, पूर्व आणि मध्य अशा पाच गटामध्ये विभागले जातील. या स्पर्धेतील प्राथमिक फेरीतील सामने त्या विभागातील संघामध्ये खेळविले जाणार असून त्यामधील विजेता निवडला जाईल. प्रत्येक विभागातील विजेता म्हणजे पाच विभागातील पाच विजेते बाद फेरीसाठी पात्र ठरतील. त्यानंतर अंतिम विजेता निवडला जाईल.
रणजी क्रिकेट स्पर्धेत देशातील विविध विभागातून सुमारे 38 संघ सहभागी होत असतात. 500 पेक्षा अधिक क्रिकेटपटू प्रत्येक वर्षी या स्पर्धेत आपला सहभाग दर्शवितात. राष्ट्रीय क्रिकेट हंगामातील रणजी स्पर्धा ही सर्वात जुनी असून या स्पर्धेसाठी दुसऱया क्रमांकाचे सर्वोच्च बक्षीस दिले जाते. प्रत्येक वर्षीच्या रणजी हंगामात प्रत्येक क्रिकेटपटू अंदाजे 10 ते 12 लाख रूपयांची कमाई करतो तसेच त्यांना पुरस्कर्त्याच्या रकमेतील वाटाही मिळतो. रणजी स्पर्धेत खेळल्यानंतरच क्रिकेटपटूला दुलीप करंडक आणि इराणी करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी संधी मिळते.