स्वातंत्र्यलढय़ातील एक अग्रेसर नेते सुभाषचंद्र बोस हे नेताजी या नावाने ओळखले जातात. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने ‘आझाद हिंद फौज’ स्थापन केली. त्यांनी दिलेला ‘जय हिन्द’चा नारा हा आज भारताचा राष्ट्रीय नारा बनला आहे. त्यांनी ‘तुम मुझे खून दो मैं तुम्हे आजादी दूंगा’ असे भारताला आव्हान दिले. आज 23 जानेवारी, 123 वी जयंती त्यानिमित्त…
भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक श्रे÷ क्रांतिकारक नेते आणि आझाद हिंद सेनेचे सरसेनापती. ‘नेताजी’ ही त्यांना लोकांनी दिलेली उपाधी. सुभाषबाबूंचे घराणे मूळचे माहिनगरचे (बंगाल). त्यांचे वडील जानकीनाथ वकिलीच्या व्यवसायानिमित्त कटकला (ओरिसा) आले. तेथेच सुभाषचंद्रांचा जन्म झाला.
शाळेत असतानाच स्वामी रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंद यांचा प्रभाव पडला. मिशन शाळेत गोऱया व हिंदी विद्यार्थ्यांमध्ये करण्यात येणारा भेदाभेद आणि विवेकानंदांचे लिखाण यामुळे राष्ट्रप्रेम निर्माण झाले. विवेकानंद-रामकृष्णांच्या ग्रंथांमुळे त्यांना ध्यान, हटयोग यातही गोडी वाटू लागली.
कॉलेजमधील पहिले वर्ष संपल्यानंतर सुट्टीत आपल्या मित्रांसह ते गुरूच्या शोधार्थ निघाले. गया, काशी, हरिद्वार, हृषिकेश, मथुरा, वृंदावन, दिल्ली, आग्रा इ. ठिकाणी फिरूनदेखील त्यांना गुरू तर मिळाला नाहीच उलट तीर्थक्षेत्री जातिपातीचे प्रस्थ, शिवाशीव इ. पाहून त्यांचा भ्रमनिरास झाला.
प्रा. ओटन यांच्या व तशाच एका गोऱया प्राध्यापकाच्या उर्मट वर्तवणुकीने अपमानित झालेल्या प्रेसिडेंट कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी हरताळ पुकारला. त्याचे नेतृत्व सुभाषबाबुंनी स्वीकारले. पण या प्रकरणी त्यांना महाविद्यालयातून काढून टाकण्यात आले. पुढे स्कॉटिश चर्च कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. ते तत्त्वज्ञान विषय घेऊन पहिल्या वर्गात बी.ए. झाले (1919). वडिलांच्या इच्छेनुसार ते आय्.सी.एस.साठी इंग्लंडला गेले. त्या वेळी असहकार आंदोलन सुरू झाले नव्हते. जालियनवाला बाग येथे काय घडले, त्याची पूर्ण कल्पना पंजाबबाहेरच्या लोकांना आली नव्हती. हळूहळू सर्व गोष्टी उजेडात आल्या. आंदोलन सुरू झाले, तेव्हा त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊन स्वदेशाची वाट धरली (1921). या वेळी महात्मा गांधींची असहकार चळवळ जोरात होती. त्यांची भेट घेऊन पुढील दिशा समजावून घेण्याचा त्यांनी प्रयत्न केला. महात्मा गांधीनीच त्यांना कलकत्त्याला चित्तरंजन दासांकडे (1921) पाठविले. मृत्यूपर्यंत सुमारे चार वर्षे सुभाषबाबूंचे राजकीय गुरू चित्तरंजनच होते.
या सुमारास इंग्लंडच्या प्रिन्स ऑफ वेल्सच्या कलकत्त्यामधील आगमनावर बहिष्कार टाकण्याची मोहीम आखण्यात आली. सुभाषबाबूंनी तीत पुढाकार घेतला (1921). त्यात त्यांना चित्तरंजन दासांबरोबर सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागला. चित्तरंजन दास कलकत्ता महानगरपालिकेचे महापौर झाल्यावर सुभाषबाबूंकडे मुख्य अधिकाऱयाची जबाबदारी आली. ब्रिटिश सरकारने सूडबुद्धीने खोटा आरोप लादून ऑक्टोबर 1924 मध्ये त्यांना स्थानबद्ध केले. दहशतवादी आंदोलनाशी संबंधित असल्याचे आरोप करण्यात आले. सुभाषबाबूंना अलीपूर, बेऱहामपूर, कलकत्ता इ. शहरांतील तुरुंगात काही काळ ठेवून पुढे मंडाल्यासही पाठविण्यात आले. कारावासात त्यांनी इतिहास, धर्मशास्त्र, मानसशास्त्र इ. विविध विषयांचे वाचन केले. अशक्त प्रकृती व क्षयाचा विकार यामुळे सुभाषबाबूंना मुक्त करण्यात आले (1927). भारतातील राजकीय परिस्थितीचा सहा महिने अभ्यास करून नंतर ते सक्रिय राजकारणात पडले. ते बंगाल प्रांतिक काँग्रेस परिषदेचे अध्यक्ष झाले. त्यांनी यूथ लीग स्थापन करून तरुणांना संघटित केले. काँग्रेसचे सरचिटणीस म्हणूनही जवाहरलाल नेहरूंबरोबर त्यांची नियुक्ती झाली (1928). दोघांनी मिळून इंडिया इंडिपेंडन्स युथ लीगची स्थापना केली (1928). त्याच वषी कलकत्ता येथील अखिल भारतीय काँग्रेसचे अध्यक्ष मोतीलाल नेहरू यांनी वसाहतीच्या स्वराज्याची मागणी करणारा ठराव काँग्रेस अधिवेशनात मांडला. जवाहरलालांसह सुभाषबाबूंनी त्यास विरोध केला आणि पूर्ण स्वातंत्र्याची मागणी करणारा ठराव मांडावा असे सुचविले. पुढे 1930 च्या सविनय कायदेभंगाच्या वेळी सुभाषबाबूंना पुन्हा अटक झाली. 1931 मध्ये मुक्तता मिळाल्यानंतर ते कलकत्ता महानगरपालिकेचे महापौर झाले. भगतसिंग यांची फाशी वाचवू शकत नसल्यामुळे व प्रत्यक्ष काहीच सवलती न मिळाल्यामुळे गांधी-आयर्विन कराराला सुभाषबाबूंनी अत्यंत कडक शब्दांत जाहीर विरोध केला होता. तेव्हापासून महात्मा गांधी व सुभाषबाबूंचे मार्ग भिन्न झाल्यासारखे दिसतात. जानेवारी 1932 मध्ये सशस्त्र क्रांतिकारक चळवळीशी संबंध जोडून सरकारने त्यांना पुन्हा स्थानबद्ध केले; पण प्रकृतीच्या कारणास्तव तुरुंगातून मुक्त करताना त्यांना देशातून हद्दपार केल्याचे सांगण्यात आले. उपचारासाठी परदेशी जाणे त्यांना भाग होतेच. 1933-36 दरम्यान ते व्हिएन्ना (ऑस्ट्रिया) येथे राहिले. या काळात त्यांनी यूरोपातील राजकीय परिस्थितीचा सर्वांगीण आढावा घेतला. फॅसिझम व साम्यवाद या दोन विचारसरणींतील उपयुक्त गोष्टी एकत्र करून एक नवीन विचारप्रणाली अनुसरावी, असे त्यांचे मत होते. त्यांनी डी व्हॅलेरा, केमाल आतातुर्क अशा नेत्यांना भेटून त्या दृष्टीने चाचपणीही केली. याच यूरोपच्या दौऱयात व्हिएन्ना येथे विठ्ठलभाई पटेलांचे सान्निध्य त्यांना लाभले.
हद्दपारीच्या आज्ञेचा भंग करून सुभाषबाबू भारतात आले (1936). त्यांना पुन्हा पकडण्यात आले. निवडणुकीनंतर त्यांची सुटका करण्यात आली. त्यांची राष्ट्रीय नियोजन समितीची स्थापना केली. त्रिपुरा काँग्रेस अधिवेशनाच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवून ती जिंकली. आपल्या अध्यक्षीय भाषणात त्यांनी ‘सहा महिन्यांत युद्धाचा भडका उडेल’, असे भाकित केले. यावर म. गांधी नाराज झाले. बहुसंख्य सभासदांनी गांधीचे नेतृत्व मान्य केल्यामुळे सुभाषबाबूंनी एप्रिलमध्ये अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन फॉर्वर्ड ब्लॉकची स्थापना केली. नागपूर (1940 च्या) अधिवेशनात अस्थायी राष्ट्रीय सरकार स्थापन करण्याची मागणी करण्यात आली; सत्याग्रहाच्या पूर्वीच त्यांना स्थानबद्ध करण्यात आले. आपल्याला मुक्त न केल्यास अन्नत्याग करू, अशी धमकी दिली. सरकारने त्यांना राहत्या घरात नजरकैदेत ठेवले. त्यावेळी अध्यात्मसाधना करणार असल्याचे भासवून त्यांनी एकांतवास पत्करला आणि वेषांतर करून भगतरामसह पेशावरमार्गे काबूल गाठले (1941). तेथून ते जर्मनीत गेले. तेथील हिंदी लोकांना ब्रिटिशांविरुद्ध लढय़ास प्रवृत्त केले आणि बर्लिन आकाशवाणीवरून ते देशबांधवांना सातत्याने आवाहन करीत राहिले. जर्मनी-इटलीमधील भारतीय सैनिकांना भेटून त्यांनी आपले मनोगत सांगितले व ब्रिटिशांविरुद्ध संघटित होण्याचे आवाहन केले. त्या वेळी जपानने ब्रिटिशांविरुद्ध रशियामध्ये आघाडी उघडली होती. बँकाक येथे जून 1942 मध्ये भारतीयांची एक परिषद भरली होती. त्यात सुभाषबाबूंना पूर्व आशियात येऊन नेतृत्व करण्याची विनंती केलेली होती. त्याप्रमाणे जर्मनीहून जपानला येताना ते द. आफ्रिका-मादागास्करपर्यंत जर्मन यूबोटीने व पुढे सुमात्रापर्यंत जपानी पाणबुडीने गेले व पेनँग ते टोकिओ हा प्रवास त्यांनी विमानाने केला (16 मे 1943). जपान येथे आल्यानंतर त्यांनी स्वातंत्र्यासाठी देशाबाहेर दुसरी आघाडी तेथे उघडली. 21 ऑक्टोबर 1943 रोजी सिंगापूर येथे आझाद हिंद सरकारची स्थापना करण्यात आली. सुभाषबाबू स्वतः राष्ट्रप्रमुख, पंतप्रधान, संरक्षण मंत्री व सरसेनापती झाले. या शासनाला जपान, जर्मनी, इटली, ब्रह्मदेश आदी अकरा राष्ट्रांनी मान्यता दिली. आझाद हिंद सेना भारताच्या दिशेने पुढे गेल्या. रंगून आकाशवाणीवरून सुभाषबाबूंनी भाषण करून ब्रिटिशांशी कोणत्याही प्रकारचा समझोता न करण्याचे, फाळणी न स्वीकारण्याचे व लढा चालू ठेवण्याचे आवाहन देशबांधवांना केले (1944). शिवाय युद्धात पराजय होत असतानासुद्धा नीतिधैर्य खचू न देण्याचे सर्वतोपरी प्रयत्न केले. महायुद्धात जर्मनी-इटली व नंतर जपानचा पराभव झाला; जपानने 15 ऑगस्ट 1945 रोजी शरणागती पत्करली. त्या वेळी त्यांनी रशियाला जाण्याचा निर्णय घेतला. मांचुरियाहून त्यांना धाडण्याची व्यवस्था फिल्ड मार्शल ताराऊ याने केली. सायगावहून 17 ऑगस्ट 1945 रोजी त्यांनी प्रयाण केले. मार्गावर 18 ऑगस्ट रोजी तैपे (तैवान) येथील विमानतळावर विमानास अपघात होऊन त्यांचे निधन झाले, असे समजण्यात येते.
सुभाषबाबूंचे एकूण जीवनच देशभक्त क्रांतिकारकाचे व म्हणून रोमांचकारी आहे. परदेशात जाऊन इतर मित्रराष्ट्रांच्या साह्याने त्यांनी प्रतिसरकार स्थापन केले, हे त्यांच्या धडाडीचे, संघटना कौशल्याचे, समयसूचकतेचे व मुत्सद्देगिरीचे निदर्शक आहे.