वृत्तसंस्था/ गुवाहाटी
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी दोन दिवसांच्या आसाम दौऱयावर असून त्यांनी शुक्रवारी राज्यात तीन ठिकाणी जाहीर सभा घेतल्या आहेत. काँग्रेस राज्यात सत्तेवर आल्यास नागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) ची अंमलबजावणी आसाममध्ये करणार नाही, असे आश्वासन त्यांनी दिले. कोणताही धर्म तिरस्कार शिकवत नाही. भारतीय जनता पक्ष धर्माच्या नावावर फूट पाडत आहे, असे अनेक आरोप त्यांनी केले.
नागपूरमध्ये स्थापन झालेली एक संघटना देश ताब्यात घेऊ पाहात आहे. तथापि, या देशातील नागरिक तसे करू देणार नाहीत. भाजप धर्माच्या आधारावर समाजामध्ये दुफळी निर्माण करून मतांची मागणी करीत आहे, अशी टीका त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव न घेता केली. काँग्रेस आसाममध्ये प्रत्येक कुटुंबाला 200 युनिट वीज विनामूल्य देईल. तसेच प्रत्येक गृहिणीला दोन हजार रुपये प्रतिमहिना दिले जातील, असे आश्वासनही त्यांनी दिले.