‘किसी चीज को अगर चाहो, तो पूरी कायनात उसे मिलाने की कोशिश करती है’ हा चित्रपटातील संवाद अनेकांच्या ओठांवर दिसून येतो. पण एका सामान्य कुटुंबातील मुलीने हे वाक्य खरे करून दाखविले आहे. चाळीत राहून, चिंचोळय़ा गल्ल्यांमधून वाटचाल करत आज तिने चंदेरी जगात पाऊल ठेवले आहे. ही गोष्ट आहे मिस इंडिया स्पर्धेतील उपविजेती मान्या सिंग हिची. मान्याचा तिच्या महाविद्यालयात सत्कार करण्यात आला आहे.
पेशाने रिक्षाचालक असलेले वडिल आणि लाड करणाऱया आईसोबत मान्याने महाविद्यालयात प्रवेश केला होता. मान्याबद्दल तिच्या वडिलांचा अभिमान शब्दाशब्दांमधून जाणवत होता. महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर मान्याने स्वतःच्या आईच्या चरणांना स्पर्श करत स्वतःच्या या यशाचे श्रेय पालकांनाच दिले आहे.
वडिलांना सार्थ अभिमान
मान्याने महाविद्यालयात जाण्यासाठी स्वतःच्या वडिलांच्या रिक्षाचीच सवारी केली आणि यावेळी तिची आईही सोबत होती. मुंबईच्या कांदिवली पूर्व येथील ठाकूर महाविद्यालयात मान्याचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले आहे.
स्वागतानंतर मान्याचा सत्कार करून तिला भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. या सोहळय़ात मान्याने सर्वांसमोर मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले आहेत.
स्वप्नाला गवसणी
मान्या सिंग मूळची उत्तरप्रदेशची रहिवासी आहे. मिस इंडियाचा किताब पटकविण्याचे तिचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न होते. या स्पर्धेत तिला यंदा यश मिळाले नसले तरीही तिने प्राप्त केलेल्या यशावर तिच्या कुटुंबाला गर्व आहे. मान्याची घौडदौड प्रेरित करणारी आहे. स्वप्ने पाहणे आणि त्यांचा पाठलाग करणे कधीच थांबवू नका असा संदेश यशातून सर्वांनाच मिळतो.