वन्यजीवांची आंतरराष्ट्रीय बाजारात 50 लाखांहून अधिक किंमत
प्रतिनिधी/ चिपळूण
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील कशेडी घाटात रिक्षातून खवले मांजरांच्या पिल्लांसह मादीच्या तस्करीचा वनविभागाने सोमवारी सायंकाळी पर्दापाश केला. या rप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रिक्षा चालक-मालकासह तिघेजण चिपळूण तालुक्यातील असल्याने खळबळ उडाली आहे. यात हस्तगत वन्यजीवांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 50 लाखांपेक्षा जास्त असण्याचा अंदाज आहे.
या तस्करीत चिपळूण तालुक्यातील कालुस्ते गावांतील रिक्षाचालक मालक नरेश प्रकाश कदम, चिवेली येथील सागर श्रीकांत शिर्के व वाघिवरे येथील सिकंदर भाई साबळे या तिघांविरूध्द भारतीय वन्यजीव संरक्षण अधिनियम 1972 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चिपळूण तालुक्यातून एका रिक्षामधून वन्यजीवांची तस्करी होत असल्याची माहिती रोहा येथील सहाय्यक वनसंरक्षक विश्वजीत जाधव यांना प्राप्त झाली. यानुसार सोमवारी सायंकाळी 5च्या सुमारास वनरक्षक अजिंक्य कदम, मंगेश पव्हरे, योगेश देशमुख, वाहनचालक राजेश लोखंडे आदींच्या पथकाने कशेडी घाटातील भोगाव खुर्द गावात सापळा रचला. यावेळी खवल्या मांजराची मादी एका पिल्लासह पोत्यात भरून रिक्षामधून (एमएच 08 एक्यू 4441) विक्रीसाठी नेत असताना आढळले. रिक्षामधील तिघांना मुद्देमालासह अटक करण्यात आली.
संबंधित हस्तगत वन्यजीवांची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत 50 लाखांपेक्षा अधिक असल्याचे सांगण्यात येत आहे. याकामी महाड वनपरिक्षेत्रातील वनरक्षक दिलीप जंगम, शरद धायगुडे, संदीप परदेशी, रोहिदास पाटील, प्रकाश पवार, गौतम इहावळे, मच्छिंद्र देवरे, प्रकाश जाधव, नवनाथ मेटकरी यांनी सहकार्य केले. पुढील तपास सहाय्यक वनसंरक्षक विश्वजित जाधव करीत आहेत.
तस्करीचे चिपळूण कनेक्शन पुन्हा उघड
या गुन्हय़ात अटक करण्यात आलेले तिघेही खाडीपट्टय़ातील कालुस्ते, चिवेली आणि वाघिवरे या गावांतील असल्याने खवले मांजर नेमके कोठून आणले, याचा शोध वनविभागाकडून घेण्यात येत आहे. यापूर्वीही खवले मांजर तस्करीच्या घटना चिपळूण तालुक्यात उघडकीस आल्या आहेत. सामाजिक संस्थांकडून खवलेमांजर तस्करीप्रकरणी जनजागृतीही करण्यात येत आहे. असे असतानाही तस्करीचे प्रकार थांबत नसल्याचे या प्रकारावरून दिसत आहे.