गोडोली / प्रतिनिधी
राज्यात कोविड – १९ च्या पार्श्वभूमीवर परवानाधारक रिक्षा चालकांना एकवेळी दिड हजाराचे अर्थसहाय्य देण्याबाबत शासनाने निर्णय घेतला आहे. सदरचा लाभ हा लाभार्थीच्या थेट बँक खात्यामध्ये कोणतीही कागदपत्रे सादर न करता आयसीआयसीआय बँकेमार्फत विकसित ऑनलाईन कार्यप्रणालीवर वाहन क्रमांक,परमिट नंबर आणि आधार क्रमांक नोंद करावा लागणार आहे. त्याबाबतचीचाचणी अंतिम टप्यात असून २२ मे पासून रिक्षाचालकांनी ऑनलाईन अर्ज उपलब्ध होणार आहेत.
ज्यांचे आधार क्रमांक बँक खात्याशी जुळतील, त्यांचा लाभ त्वरित संबंधित खात्यावर जमा होणार असल्याचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद चव्हाण यांनी ‘तरुण भारत ‘ शी बोलताना सांगितले. सध्या राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील रिक्षा संघटना प्रतिनिधींना अर्ज प्रक्रियेबाबत ऑनलाईन सादरीकरण दि.२१ मे पासून करण्यात येणार असल्याचे माहिती परिवहन आयुक्त कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.
‘सातारा जिल्ह्यातील सर्व रिक्षा चालकांना मदत म्हणून देण्यात येणारे अर्थसाह्य त्यांच्या आधारकार्ड शी लिंक असणाऱ्या बँक खात्यात जमा होणार आहे. प्रत्येकाने अर्ज करताना योग्य माहिती बीनचुक भरावी,’असे आवाहन प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.