कणकवलीतील अधिकाऱयांच्या बैठकीत पालकमंत्र्यांच्या सूचना : महामार्ग उड्डाणपुलाचे काम एवढय़ात सुरू करू नये!
फोंडाघाट चेकपोस्ट सीमेवर सुरू करावे!
कॅन्सर रुग्णांच्या औषधांची मागणी नोंदवून घ्या!
प्रतिनिधी / कणकवली:
फोंडाघाट येथील चेकपोस्टमुळे गावातील काही भाग एका बाजूला राहतो. त्यामुळे फोंडाघाट येथील चेकपोस्ट गावच्या सीमेवर सुरू करण्यासंदर्भात कार्यवाही करण्यात यावी. कणकवलीतील शिवभोजन योजनेंतर्गत संबंधीत बचतगटाने शक्य असेल, तेवढय़ांना जेवण उपलब्ध करून द्यावे, तेवढे उद्दिष्ट वाढविलेले आहे. येथील उपजिल्हा रुग्णालयात येणारे रुग्ण वा नातेवाईकांसाठी तातडीने कॅन्टीन सुरू करावे. तर शहरातील ओव्हरब्रिजचे काम सुरू करण्यासंदर्भात प्रशासन व पोलिसांकडून सूचना येत नाहीत, तोपर्यंत कामे सुरू करू नयेत. कॅन्सर रुग्णांची यादी तयार करा. त्यांची औषधे आपल्यास्तरावर मागवून घेण्यासंदर्भात कार्यवाही करू, अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांनी येथील तहसील कार्यालयात भेट देत प्रशासकीय पातळीवरील कामांची माहिती घेत बैठक घेतली. यावेळी आमदार वैभव नाईक, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, कोकण पाटबंधारे महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर, तहसीलदार आर. जे. पवार, मुख्याधिकारी अतुल पिंपळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संजय पोळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संजय शेवाळे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सहदेव पाटील, गटविकास अधिकारी मनोज भोसले, पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी आदी उपस्थित होते.
रुग्णालयात कॅन्टीन सुरू करा!
फोंडाघाट चेकपोस्ट सीमेवर घेण्याबाबत लोकांनी मागणी केलेली आहे. प्रशासनाचेही तसेच मत आहे. त्यामुळे जागेची पाहणी करून ते सीमेवर घेण्यात यावे. याबाबत आपण पोलीस अधीक्षकांशी बोललो असल्याचे सामंत यांनी सांगितले. उपजिल्हा रुग्णालयात बाहेरून येणारे रुग्ण व नातेवाईक आहेत. सध्या वाहतूक बंद आहे, हॉटेल बंद आहेत. त्यामुळे लोकांची गैरसोय होत आहे. यासाठी उपजिल्हा रुग्णालयात तातडीने कॅन्टीन सुरू करण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या. उपजिल्हा रुग्णालयात सुरू असलेल्या चार डायलेसीस मशीनपैकी एक मशीन केवळ काविळीच्याच पेशंटसाठी वापरण्यात यावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शक्य तेवढय़ा थाळय़ा द्या!
शिवभोजन योजनेचे उद्दिष्ट वाढीसंदर्भात तालुकाप्रमुख शैलेश भोगले, नगरसेवक सुशांत नाईक यांनी मागणी केली होती. त्यावर संबंधीत बचत गटाकडून सध्या 112 पर्यंत थाळय़ा दिल्या जात असल्याचे प्रांताधिकाऱयांनी सांगितले. त्यावर त्या बचत गटाकडून शक्य असेल तेवढय़ा थाळय़ा द्याव्यात, असे पालकमंत्री म्हणाले.
कॅन्सर रुग्णांना औषध द्या
जिल्हय़ात कॅन्सरचे रुग्ण आहेत. त्यांना नियमित औषध, केमोसाठीच्या औषधांचा प्रश्न निर्माण झाला आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाकडून तातडीने कॅन्सरच्या रुग्णांची यादी व त्यांना लागणाऱया औषधांची यादी तयार करा. आवश्यकता वाटल्यास आम्ही योगदान देत औषधे आणू पण त्यांना औषधे मिळाली पाहिजेत, हे लक्षात घ्या. एचआयव्हीच्या रुग्णांना जिल्हा रुग्णालयात जाऊन औषधे आणावी लागतात. त्यांची गावनिहाय यादी करून नावांची गुप्तता पाळत प्राथमिक आरोग्य केंद्रामार्फत ही औषधे त्या रुग्णांच्या घरापर्यंत पोहोचविण्यात यावीत, असे आदेशही सामंत यांनी दिले.
निर्बंध पाळत काजू खरेदी!
आंबा, काजू, कृषीमालासंदर्भात लवकरच काही निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी तालुकापातळीवर काही काजू व्यापारी काजू खरेदी करत आहेत. सद्यस्थितीत त्यांना काजू खरेदी करता येत नाही. त्यांना काजू खरेदी करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी सूचना वैभव नाईक यांनी मांडली. त्यानुसार शहरातील अशा व्यापाऱयांना आवश्यक निर्बंध पाळत काजू खरेदीसाठीची मुभा देण्याच्या सूचना केल्या. याशिवाय दोन वाडय़ा, अथवा गावाचा संपर्क तुटणारी ब्रिज, साकव, अत्यावश्यक रस्ता, पाणीटंचाईची कामे सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
नालेसफाई सुरू करा!
शहरातील काही कामे सुरू करण्यासंदर्भात मुख्याधिकाऱयांनी विनंती केली असता, नालेसफाईची कामे तातडीने सुरू करा, इतर कामांबाबत नंतर प्राधान्य ठरवून करण्यात येतील, असे सामंत म्हणाले. शहरातील महामार्गाच्या ओव्हरब्रिजचे काम सद्यस्थितीत बंद ठेवा. केंद्र सरकारने परवानगी दिली म्हणजे झालेले नाही. स्थानिक प्रशासन व पोलिसांकडून सूचना येईपर्यंत कामे बंद ठेवा, असेही त्यांनी स्पष्ट केले. शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, नीलम सावंत-पालव, रुपेश नार्वेकर, सुजीत जाधव, माही परुळेकर, भूषण परुळेकर, सचिन सावंत आदी उपस्थित होते.