पोलीस बंदोबस्तात झाली कारवाई
प्रतिनिधी /मडगाव
रूमडामळ-दवर्ली ग्रामपंचायत क्षेत्रात मोठय़ा प्रमाणात अतिक्रमणे करण्यात आली होती. ही अतिक्रमणे स्वताहून हटविण्यासाठी पंचायतीने संबंधितांना मुदत दिली होती. परंतु, ही अतिक्रमणे स्वताहून हटविण्यास कुणीच राजी न झाल्याने काल मंगळवारी पंचायतीला कारवाई करणे भाग पडले. ही कारवाई करताना काही लोकांनी या ठिकाणी तणाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पण, पंचायतीने अतिरीक्त पोलीस बंदोबस्त घेऊन अतिक्रमणे हटविली.
मारूती मंदिर ते हाऊसिंग बोर्ड रस्त्याच्या दुतर्फा मोठय़ा प्रमाणात लोकांनी अतिक्रमण केले होते. काहीं जणांनी तर चक्क रस्त्याच्या बाजूच्या गटारावरील लादय़ावर बांधकाम करण्यापर्यंत मजल गाठली होती. ही सर्व बांधकामे बेकायदेशीर होती. गटावर बांधकाम करण्यात आल्याने ही गटार साफ करण्यास पंचायतीला अडचण ठरत होती. त्यामुळे तो पंचायत मंडळात चर्चेचा विषय बनला होता.
शेवटी रस्त्याच्या दुतर्फा करण्यात आलेल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्याचा निर्णय पंचायत मंडळाने घेतला होता. ज्यांनी बेकायदा अतिक्रमणे करण्यात आली होती. त्या सर्वांना नोटीस बजावून स्वताहून अतिक्रमणे हटविण्यास मुदत दिली होती. पंचायत मंडळाने दिलेल्या मुदतीच्या काळात अवघ्याच जणांनी स्वताहून अतिक्रमणे हटविली होती. उर्वरित अतिक्रमणे हटविण्यास स्वताहून कुणीच पुढाकार घेतला नसल्याने काल पंचायतीने प्रत्यक्ष कारवाईला सुरवात केली.
पंचायतीने काल सकाळी जेव्हा अतिक्रमणे हटविण्यास प्रारंभ केला, त्यावेळी या भागातील काही लोकांनी अतिक्रमणे हटविण्यास मज्जाव करण्याचा प्रयत्न केला. अतिक्रमणे हटविताना ठराविक भागातील अगोदर हटवावी व नंतर इतरांवर कारवाई करावी अशी मागणी केली. यावेळी रूमडामळ-दवर्लीचे सरपंच विनायक वळवईकर व मज्जाव करणाऱयांच्या दरम्यान शाब्दीक वाद झाला. यावेळी सरपंच श्री. वळवईकर यांनी सर्वच अतिक्रमणांवर कारवाई केली जाईल. ही कारवाई ठराविक लोकांना टार्गेट करण्यासाठी केली जात नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, कारवाईला विरोध होत राहिल्याने तसेच पोलीस बंदोबस्त कमी प्रमाणात असल्याने कारवाई तात्पुरती बंद ठेवण्यात आली.
संध्याकाळच्या सत्रात केपे, कोलवा, मायणा-कुडतरी व मडगाव पोलीस स्थानकाचा अतिरीक्त पोलीस बंदोबस्त घेऊन अतिक्रमणांच्या विरोधात कारवाई करण्यात आली. यावेळी मात्र, कुणीच मज्जाव करण्याचा प्रयत्न केला नाही. रूमडामळ पंचायत या पुढे अशी बेकायदा अतिक्रमणे खपवून घेणार नसल्याचा इशारा सरपंच विनायक वळवईकर यांनी दिला. लोकांनी पंचायतीला सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
ही अतिक्रमणे हटविण्याची कारवाई सुरू असताना सासष्टीचे मामलेदार लक्ष्मीकांत देसाई, सर्कल इन्स्पेक्टर निशीकांत गांवकर, पंचायत सचिव तसेच सरपंच विनायक वळवईकर, उपसरपंच मधुकला शिरोडकर तसेच इतर पंच सदस्य उपस्थित होते.