रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांचा आरोप : मडुरा स्थानकावरील प्रकाराची चौकशी करा!
प्रतिनिधी / बांदा:
मडुरा रेल्वे स्थानकावर शनिवारी दुपारी थांबलेल्या गाडीतून अनेक प्रवासी उतरून जंगलात पळाल्याची घटना घडली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून याची माहिती कोकण रेल्वेचे रत्नागिरी रिजनल मॅनेजर यांना दिली असता ‘मी कामात आहे. रेल्वे स्थानकाला जाऊन सांगा’, असे बेजबाबदार उत्तर दिले. स्थानिक पातळीवर कोरोनासंदर्भात प्रशासन जबाबदारीने काम करत असताना ‘त्या’ पळालेल्या प्रवाशांमधून रोगाचा प्रसार झाल्यास जबाबदार कोण? याची चौकशी करून संबंधितांवर तात्काळ कारवाई करावी. अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल. त्याला प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा रोणापाल सरपंच सुरेश गावडे यांनी दिला.
रोणापाल ग्रामपंचायत सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपसरपंच पप्या केणी, रोणापाल तंटामुक्त समिती अध्यक्ष प्रकाश गावडे उपस्थित होते. दिल्लीहून मडगावच्या दिशेने जाणारी राजधानी एक्स्प्रेस शनिवारी दुपारच्या सुमारास मडुरा रेल्वे स्थानकात थांबल्याने सुमारे 25 प्रवासी खाली उतरले होते. त्यापैकी कारवारला जाणाऱया तीन प्रवाशांना रोणापाल ग्रामस्थांनी पकडले. जर स्थानिकांसाठी गाडय़ा सोडल्या नाहीत, तर थांबा नसताना मडुरा स्थानकावर गाडी थांबली कशी, असा सवाल गावडे यांनी उपस्थित केला.
‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर जिह्यातील प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहेत. असे असताना रेल्वेकडून असा प्रकार घडणे उचित नाही. मुंबई, पुणे तसेच राज्यातील अन्य ठिकाणी असलेल्या कोकणातील चाकरमान्यांना गावी येण्यासाठी 20 ते 30 हजार रुपये खर्च करून खासगी गाडीने यावे लागते. यासाठी कोकण रेल्वे
प्रशासनाद्वारे विशेष गाडय़ा का सोडल्या जात नाहीत? परराज्यातील नागरिकांसाठी जर गाडी सोडली तर ती मडुरा स्थानकात थांबविण्याआधी स्थानिक प्रशासनास कल्पना देणे गरजेचे होते. असे असते तर प्रवासी गाडीतून खाली उतरले नसते. उतरलेल्या सर्व प्रवाशांना शोधून काढून त्यांची तपासणी करण्याची मागणी गावडे यांनी केली आहे.
बेजबाबदार अधिकारी
दरम्यान, त्याच दिवशी गावडे यांनी कोकण रेल्वेचे रत्नागिरी रिजनल मॅनेजर यांना सदर घटनेची कल्पना दिली. परंतु ‘त्या’ अधिकाऱयाने, ‘मी कामात आहे, रेल्वे स्थानकात जाऊन सांगा’ असे बेजबाबदार उत्तर दिल्याचे सुरेश गावडे यांनी सांगितले. तसेच सिंधुदुर्गापेक्षा रत्नागिरीत ‘कोरोना’बाधितांचा आकडा मोठा आहे. असे असताना जर रेल्वे अधिकारी बेजबाबदार वागत असतील तर त्यावर कारवाई कोण करणार, असा सवाल गावडे यांनी केला.