चार विद्युत उपकेंद्रांच्या जोडणीचे काम अंतिम टण्यात, इंधनासाठी होणारा खर्च वाचणार
राजू चव्हाण / खेड
कोकण रेल्वे मार्गावरील रोहा-रत्नागिरीपर्यंत चार विद्युत उपकेंद्रांच्या जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. लॉकडाऊननंतर विद्युतीकरणाचे काम काहीकाळ ठप्प झाले होते. मात्र, एप्रिलनंतर ठेकाधारक एल अँण्ड टी कंपनीने विद्युतीकरणाचे काम युद्धपातळीवर हाती घेतले. या मार्गावरील सर्वच रेल्वेगाड्या येत्या डिसेंबरपासून वीजेवर धावणार आहेत. यामुळे कोकण रेल्वेला इंधनासाठी कराव्या लागणाऱ्या खर्चाला कायमचाच पूर्णविराम मिळणार आहे.
कोकण रेल्वे मार्गावरून धावणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्या इंधनावर धावत आहेत. या रेल्वेगाड्यांच्या इंधनासाठी कोकण रेल्वेला मोठा खर्च करावा लागतो. हा खर्च कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने कोकण मार्गावर धावणाऱ्या सर्वच रेल्वेगाड्या वीजेवर चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार रोहा ते कर्नाटकातील ठोकूर या ७३८ किलोमीटर लांबीच्या मार्गावर सर्व रेल्वेगाड्या मे २०२१ पर्यंत विद्युतीकरणावर सुरू करण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे.
त्यानुसार कोकण मार्गावर गेल्या तीन वर्षांपासून विद्युतीकरणाची प्रक्रिया हाती घेण्यात आली. यासाठी माणगाव, कळंबणी, आरवली रोड, रत्नागिरी, खारेपाटण, कणकवली, थिविम याठिकाणी ट्रॅक्शन उपकेंद्रे उभारण्यात येणार आहेत. कोकण मार्गावरील माणगाव, कळंबणी, आरवली रोड, रत्नागिरी याठिकाणी ४ उपकेंद्रांचा समावेश आहे. कोकण रेल्वेला विद्युतीकरणासाठी डिसेंबर २०२०ची कालमर्यादा ठेकाधारक एल अँण्ड टी कंपनीला देण्यात आली आहे. त्यानुसार कंपनीकडून विद्युतीकरणाचे काम २०१७) प्रसून जोमात सुरू होते.
या चार विद्युत उपकेंद्रांच्या जोडणीचे काम युद्धपातळीवर सुरू असतानाच कोरोनाच्या लॉकडाऊननंतर विद्युतीकरणाचे काम काहीकाळ थांबण्याची नामुष्की ओढवली होती. मात्र, एप्रिल महिन्यापासून विद्युतीकरणाच्या कामाला पुन्हा गती देण्यात आली. गेल्या तीन वर्षापासून सुरू असलेल्या चारही विद्युत उपकेंद्रातील जोडणीचे काम सद्यस्थितीत जवळपास पूर्ण झाले आहे. रोहापासून रत्नागिरीपर्यंतच्या मार्गावर तीन टप्प्यात चाचणी करण्यात येणार आहे. यानंतरच डिसेंबर महिन्यापासून कोकण मार्गावरून धावणाऱ्या रेल्वेगाड्या वीजेवर धावणार आहेत.
कोकण मार्गावरील रोहा ते वेर्णा (गोवा) व वेर्णा ते ठोकूर (कर्नाटक) या दोन टप्प्यांमध्ये करण्यात येणाऱ्या विद्युतीकरणाच्या कामासाठी ११०० कोटी रूपयांचा खर्च अपेक्षित असल्याचे सांगण्यात येत असून आतापर्यंत ४५६ कोटी रूपयांचा खर्च झाला असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
युद्धपातळीवर प्रयत्न सुरू
कोकण रेल्वे मार्गावरील रोहा ते रत्नागिरीपर्यंतच्या विद्युतीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यासाठी आवश्यक त्या तांत्रिक बाबींची पूर्तता करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असून विद्युतीकरणाच्या रितसर चाचण्याही करण्यात येतील.
–सचिन देसाई, कोकण रेल्वे जनसंपर्क अधिकारी