ऑनलाईन टीम
भारतीय संघाने तिसऱ्या आणि अंतिम टी२० सामन्यात श्रीलंका संघाला पराभूत करत नववर्ष २०२० मधील पहिला मालिका विजय साजरा केला. पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर झालेल्या सामन्यात भारताने श्रीलंका संघावर ७८ धावांनी मात केली. भारताच्या २०२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकन संघाचा १२३ धावांतच खेळ आटोपला. भारतीय गोलंदाजांच्या माऱ्यापुढे लंकेच्या खेळाडूंचा निभाव लागला नाही.
तत्पूर्वी, श्रीलंकेचा कर्णधार लसिथ मलिंगाने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. पहिल्यांदा फलंदाजीस आलेल्या भारतीय संघाची चांगली सुरुवात झाली. शिखर धवन (५२) आणि लोकेश राहुल (५४) या दोन्ही सलामीवीरांनी अर्धशतके साकारत ९७ धावांची सलामी दिली. त्यानंतर आलेला संजू सॅमसन (६), श्रेयस अय्यर (४) वॉशिंग्टन सुंदर (०) यांना मोठी धावसंख्या करण्यात अपयश आले. विराट कोहलीही २७ धावांवर बाद झाल्याने भारताची काहीशी पडझड झाली. मात्र, मनिष पांडेने केलेल्या १८ चेंडूत नाबाद ३१ धावा आणि शेवटी शार्दुल ठाकूरने ८ चेंडूत फटकेबाजी करत जमवलेल्या २२ धावांच्या बळावर भारतीय संघाने २० षटकांत ६ बाद २०१ धावांचे तगडे आव्हान श्रीलंकेला दिले.
भारताचे २०२ धावांचे तगडे आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या श्रीलंकेच्या संघाची सुरुवात निराशाजनक राहिली. अँजेलो मॅथ्यूज (३१) आणि धनंजय डि सिल्वा (५७) वगळता एकाही खेळाडूला दुहेरी धावसंख्या करता आली नाही. धनंजयने एका बाजूने खिंड लढवली मात्र भारतीय माऱ्यापुढे श्रीलंकेच्या फलंदाजांनी तग धरला नाही. १५.५ षटकांत १२३ धावांवर श्रीलंकेचे सर्व खेळाडू बाद झाले. भारताच्या नवदीप सैनीने ३ तर शार्दुल ठाकूर आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी दोन गडी बाद केले. जसप्रीत बुमराहने पहिल्याच षटकात श्रीलंकेच्या सलामीवीराला माघारी धाडले.