कोलंबो / वृत्तसंस्था
लंकेच्या विद्यमान क्रीडामंत्र्यांनी शुक्रवारी 2011 वर्ल्डकप अंतिम सामना फिक्स होता का, याची चौकशी सुरु करण्याचे आदेश जारी केले. तत्कालीन क्रीडामंत्री महिंदानंदा अलुथगमगे यांनी तो सामना फिक्स होता, असा आरोप गुरुवारी नव्याने केला होता. त्यावर लंकन प्रशासनाने चौकशीचे फर्मान काढले आहे. चौकशी करावी आणि प्रत्येक दोन आठवडय़ांनी त्या चौकशीच्या प्रगतीचा अहवाल सादर करावा, असे क्रीडामंत्री डल्लस अलाहाप्पेरुमा यांनी पत्रकातून नमूद केले.
लंकन संघाने वर्ल्डकप फायनलचा तो सामना भारताला ‘विकला’ होता, असा दावा यापूर्वी महिंदानंदा यांनी केला. माजी कर्णधार कुमार संगकारा व त्या सामन्यातील शतकवीर महेला जयवर्धने यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले. शिवाय, पुरावे असल्यास ते आयसीसीकडे सादर करावेत, अशी मागणीही केली. 275 धावांचा पाठलाग करताना भारताने त्या सामन्यात गौतम गंभीर (97) व तत्कालीन कर्णधार महेंद्रसिंग धोनी (91) यांच्या झंझावाती खेळीमुळे डोळय़ाचे पारणे फेडणारा विजय संपादन केला होता.