पंतप्रधानांचे देशवासियांना आवाहन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
100 कोटी लसीकरण ही फक्त एक संख्या नसून देशातील जनतेच्या सामर्थ्याचे प्रतिबिंब आहे. नवीन भारताची ही ताकद आहे, असे संबोधन करत शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांची पाठ थोपटली. कोणताही भेदभाव न करता लसीकरण करण्यात आले. यामध्ये व्हीआयपी कल्चरचा शिरकाव करु दिला नाही. बडय़ा देशांनाही अशक्यप्राय असलेले काम भारतीयांनी करून दाखवले आहे. नवीन तंत्रज्ञानाच्या मदतीने आणि विज्ञानवादी दृष्टीकोनातून मोहिमेला यश आल्याचे नमूद करत भारताच्या या प्रयत्नांचे जगभरातून कौतुक होत असल्याचे मोदी पुढे म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी देशाला संबोधित केले. कोरोना कालावधीच्या 19 महिन्यांच्या काळातील देशवासियांना उद्देशून केलेले त्यांचे हे दहावे भाषण होते. शुक्रवारच्या आपल्या 20 मिनिटांच्या भाषणात कोरोना लसीचे 100 कोटी डोस पूर्ण करणे आणि साथीला सामोरे जाण्यासाठीची सावधगिरी या मुद्दय़ांवरच केंद्रीत राहिले. तरीही अर्थव्यवस्था, शेतकरी आणि सणांबद्दल देखील त्यांनी ओझरता उल्लेख केला. इतकेच नाही तर मास्कसंदर्भात बोलताना ‘कोरोनाविरोधी लढाई संपेपर्यंत शस्त्रे म्यान करू नका’ असा एक नवीन मंत्र त्यांनी दिला.
भारताने 100 कोटी कोरोना लसीकरणाचे कठीण पण असाधारण लक्ष्य पार केले. देशातील 130 कोटी जनतेचे सहकार्य आणि कर्तव्यशक्ती या पाठीमागे असल्याचे सांगत पंप्रधानांनी शुक्रवारी सर्व भारतीयांचे अभिनंदन केले. भारताच्या आरोग्य व्यवस्थेवर 100 वर्षानंतर आलेल्या सर्वात मोठय़ा महामारीनंतर प्रश्न उपस्थित करण्यात आले. भारत या महामारीचा कसा सामना करणार? भारताकडे इतर देशाकडून लस खरेदी करण्यासाठी पैसे कुठून येणार? भारताला कोरोना प्रतिबंधक लस कधी मिळणार? यासारख्या सर्व प्रश्नांची उत्तरे 100 कोटी डोसचा ऐतिहासिक टप्पा गाठण्यामध्येच असल्याचा निर्वाळा देत त्यांनी विरोधकांना फटकारले. भारत गरीब-श्रीमंत, गाव-शहर असा महामारी भेदभाव करत नसल्यामुळे लसीकरणातही भेदभाव नाही. त्यामुळे लसीकरणात व्हीआयपी कल्चरचा शिरकाव होऊ दिला नसल्याचे मोदी म्हणाले. आपल्यासाठी लोकशाही म्हणजे सबका साथ असल्याचेही ते म्हणाले.
आता अर्थव्यवस्थाही तेजीकडे
तज्ञ आणि देश-विदेशातील अनेक संस्था भारतामधील अर्थव्यवस्थेबाबत सकारात्मक आहेत. भारतात गुंतवणूकदार वाढत आहेत. त्याचबरोबर मोठय़ा प्रमाणावर रोजगारही उपलब्ध होत आहे. मोठी गुंतवणूक स्टार्टअपमध्ये सुरु असल्याचे सांगत ‘मेड इन इंडिया’ची चमक जगालाही भुरळ घालेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला
स्वदेशी मालाची खरेदी करा!
स्वच्छ भारत अभियानाप्रमाणेच वोकल फॉर लोकलचाही नारा द्यायला हवा. भारतात तयार झालेल्या अथवा भारतीयांनी तयार केलेल्या गोष्टी खरेदी करायला हव्यात. ‘मेड इन इंडिया’वर भर द्यायला हवा. भारतीयांच्या सहभागानंतरच हे सर्व यशस्वी होईल असे सांगत स्वदेशी वस्तू खरेदी करून अर्थव्यवस्था अधिक संपन्न करा, असेही मोदी म्हणाले.
नियम पाळा, मास्क घाला, गर्दी टाळा !
कोरोनाविरोधातील लढा अजूनही संपलेला नाही. त्यामुळे युद्ध जोपर्यंत सुरु आहे, तोपर्यंत शस्त्र टाकायची नाहीत. कोरोनाचे नियम सणासुदीच्या काळात पाळा, मास्क घाला, गर्दी टाळा. गेल्या दिवाळीपेक्षा यंदाची परिस्थिती चांगली आहे. पण, कोरोना नियमांचे पालन करा. मोठी आव्हाने कशी पेलायची हे भारताला चांगलेच माहित आहे. यासाठी आपल्याला सावध राहायला हवे. निष्काळजीपणा करुन चालणार नसल्याचे मोदी म्हणाले.