शिवसेना नेते संजय राऊत यांची रोखठोक भूमिका
प्रतिनिधी / बेळगाव
राष्ट्रीय पक्षांनी आपले उमेदवार दिल्याने त्यांचा प्रचार करण्यास नेते मंडळी येत असतील तर त्याला आक्षेप घेण्याचे कारण नाही. परंतु महाराष्ट्रातून येऊन मराठी उमेदवाराच्या विरोधात प्रचार करणे ही बेईमानी आहे. महाराष्ट्रातील मराठी भाषिक व सीमाबांधव हे एकाच धाग्याने बांधले गेले आहेत. मग मराठी लोकांमध्ये फूट पाडून तुम्ही हे पाप कुठे फेडाल? बऱयाच वर्षांनंतर मराठी माणसांची एकजूट होताना दिसत असताना त्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नका. लढय़ामध्ये सहभागी होता येत नसेल तर निदान तोडफोड तरी करू नका, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिला.
बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीतील मध्यवर्ती म. ए. समितीचे उमेदवार शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी संजय राऊत बेळगावात आले होते. गुरुवारी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडली. शुभम शेळके यांच्या प्रचारासाठी झालेल्या रोड शो व सभेवेळी तरुणांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. अन्यायाविरोधात मराठी भाषिक एकवटत असून, शुभम शेळकेंच्या रुपाने शिवसेनेचा 22 वा खासदार लोकसभेत पोहोचेल, असा विश्वास खासदार राऊत यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रात व मुंबईत अनेक तेलगू, कन्नड, तमिळ भाषिक राहतात. ते आपले उद्योग, संस्कृती टिकवून आहेत. आम्ही कधीही त्यांना कसलाही त्रास दिला नाही. त्यांच्या शाळा बंद पाडल्या नाहीत. उलट शाळा, ग्रंथालये यांना आर्थिक मदत केली आहे. गिरीश कर्नाड, गंगुबाई हनगल, भीमसेन जोशी हे कर्नाटकातील असले तरी त्यांना महाराष्ट्राने प्रेम दिले. त्यामुळे संस्कृतीची ही देवाणघेवाण अशीच सुरू ठेवायची असेल तर सीमावासियांवरील अन्याय थांबवावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.
सीमाभागातील मराठी भाषिकांवर अन्याय झाला की त्याचे प्रत्युत्तर कोल्हापूरसह महाराष्ट्रभर होते. आम्ही स्वतःहून अन्याय करायला जात नाही. आणि आमच्यावर झाला तर तो सहन करत नाही. त्यामुळेच या दोन राज्यांमधील संबंध अधिक ताणले जात आहेत. उन्हाळय़ात महाराष्ट्राच्या पाण्यावरच कर्नाटक आपली तहान भागवतो. मनात आणले तर हे पाणी बंद केल्यास कर्नाटकात पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. परंतु पाणी प्रश्नावरून राजकारण करणे आमच्या संस्कृतीत बसत नाही, असे संजय राऊत यांनी सांगितले.