कृषी विषयक प्रशिक्षणे राबविणार- डॉ. बी. एन. सावंत
प्रतिनिधी / वेंगुर्ले:
वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात लॉकडाऊन कालावधीत म्हणजे मार्च ते जुलै या कालावधीत आंबा, काजू, फणस, जांभूळ, नारळ रोपे, मसाला पिके व अन्य 1 लाख 4 हजार 859 कलमांची विक्री करण्यात आली. पुढील कालावधीत शेतकऱयांसाठी स्वयंरोजगार निर्मितीसाठी विविध कृषीविषयक प्रशिक्षणांचे आयोजन करून त्यांचा सामाजिक व आर्थिकस्तर उंचावण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्राचे सहयोगी संचालक डॉ. बी. एन. सावंत यांनी सांगितले.
वेंगुर्ले प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात मार्च ते जुलै या कालावधीत आंबा 29 हजार 382, काजू 24 हजार 885, फणस 1 हजार, जांभूळ 20 हजार 234 नारळ रोपे 7 हजार 355, मसाला पिके 14 हजार 3 व अन्य कलमे, रोपे 8 हजार अशी एकूण 1 लाख 4 हजार 859 कलमांची विक्री करण्यात आली.
लॉकडाऊनकाळात शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करुन कलम, रोपे विक्री करण्यात आली. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी कलम, रोपांची विक्री ही अधिक प्रमाणात व लवकर पूर्ण झाली. लॉकडाऊन असल्यामुळे परजिल्हय़ाच्या तुलनेत सिंधुदुर्ग जिल्हय़ातील शेतकऱयांनी मोठय़ा प्रमाणात कलम व रोपांची उचल केली. मुंबईस्थित चाकरमानी बऱयापैकी सिंधुदुर्गात स्थिरावल्यामुळे ते आता शेतीकडे शाश्वत उत्पन्नाचे साधन म्हणून पाहत आहेत. पुढील कालावधीत अशा शेतकऱयांसाठी स्वयंरोजगार निर्मितीसाठी विविध कृषीविषयक प्रशिक्षणाचे आयोजन करून त्यांचा सामाजिक व आर्थिकस्तर उंचावण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे सांगितले.