प्रतिनिधी/ बेळगाव
वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे गेल्या आठवडाभरात बेळगाव ठळक चर्चेत आले आहे. मात्र, बिम्समधील सावळय़ा गोंधळामुळे रुग्णांना फटका बसत असून त्यांना व्यवस्थित उपचार मिळत नाहीत, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सरकारच्या नावाने शंखध्वनी सुरू आहे. पालकमंत्र्यांच्या बैठकीत यावर गांभीर्याने चर्चा होण्याची शक्मयता आहे.
गेल्या बुधवारी 22 जुलै रोजी कोरोनाबाधिताच्या मृत्यूनंतर सिव्हिलसमोर नातेवाईकांचा उदेक झाला. दगडफेक, रुग्णवाहिका पेटविण्याची घटना घडली. सरकारने प्रादेशिक आयुक्त आदित्य आमलान बिश्वास यांच्याकडून या घटनेसंबंधी अहवाल मागवला आहे. पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांनीही याची गंभीर दखल घेतली आहे.
सोमवारी पालकमंत्री बेळगावला येणार आहेत. कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ते अधिकाऱयांची बैठक घेणार आहेत. या बैठकीत सद्यपरिस्थितीवर चर्चा होणार आहे. या सावळय़ा गोंधळाला कारणीभूत कोण? याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाईची शक्मयता आहे.
खासगी उपचार सर्वसामान्यांना परवडत नाहीत. बिम्समध्ये जागा नाही. जागा असली तरी व्यवस्थित उपचार मिळत नाहीत. गलेलठ्ठ पगार घेणारे सद्यपरिस्थितीत बिम्सकडे फिरकत नाहीत. बिम्समधील इंटर्न व परिचारिकांवर सध्या उपचाराची धुरा आहे. कोविड-19 वॉर्डमध्ये काय परिस्थिती आहे, रुग्णांवर कशा पद्धतीने उपचार सुरू आहेत, याची पुसटशी माहितीही बाहेर जाऊ नये, याची काळजी बिम्स प्रशासनाने घेतली आहे.
या सर्व परिस्थितीची जाणीव पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांना झाली आहे. त्यामुळे सोमवारी होणाऱया अधिकाऱयांच्या बैठकीत याचा आढावा घेऊन बिम्समधील सावळा गोंधळ सुधारण्यासाठी योग्य सूचना देण्यात येणार आहेत किंवा काही महत्त्वाचे बदलही अपेक्षित असल्याची माहिती मिळाली असून सोमवारच्या बैठकीनंतर एक स्पष्ट चित्र मिळणार आहे.