उमेश गाळवणकर यांनी वेधले जिल्हाधिकाऱयांचे लक्ष : चौकशी व काम थांबविण्याची मागणी
वार्ताहर / कुडाळ:
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तयार झालेल्या बिकट परिस्थितीतही कोकण रेल्वे मार्गावर सहाय्यक अभियंता पवन जोशी लॉकडाऊनच्या काळात बारा ते पंधरा कामगारांना एकत्र घेऊन जबरदस्तीने काम करीत आहेत, असे केआरसी एम्प्लॉईज युनियनचे उपाध्यक्ष उमेश गाळवणकर यांनी जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या सूचनांचे पालन न करता कोकण रेल्वेच्या कामगारांचा जीव धोक्यात घालण्याच्या या प्रकाराची चौकशी करावी व लॉकडाऊन संपेपर्यंत असले जीवघेणे प्रकार थांबविण्याबाबत आपणाकडून आदेश व्हावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.
दरम्यान, गोवा राज्यातील कामगार आणून झाराप रेल्वे ट्रकवर रुळ भरण्याचे काम शनिवारी सुरू होते, याकडेही गाळवणकर यांनी कुडाळ प्रांताधिकारी व तहसीलदार यांचे लक्ष वेधले. दुसऱया राज्यात येताना रेल्वे प्रशासनाने परवानगी घेतली नाही. येथील प्रशासनाला अंधारात ठेवून काम करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
कणकवली स्थानकादरम्यान काम
कोरोनामुळे सरकारने संपूर्ण देशात संचारबंदी लागू केली आहे. तसेच मार्गदर्शक सूचना केंद्र व राज्य शासनाकडून देण्यात येत आहेत. असे असतानाही कोकण रेल्वेचे कणकवली येथील सहाय्यक अभियंता पवन जोशी केंद्र व राज्य शासनाच्या आदेशाचे उल्लंघन करून कोकण रेल्वेच्या कामगारांना वेठीस धरीत आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. 9 एप्रिल रोजी सहाय्यक अभियंता जोशी कणकवली रेल्वे स्थानकाच्या दरम्यान रेल्वे ट्रकवर बारा ते पंधरा कामगारांना एकत्रित घेऊन काम करीत होते. कोकण रेल्वेच्या कामगारांचा जीव धोक्मयात घातला जात आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
झाराप येथेही काम सुरू
झाराप रेल्वेस्थानकानजीकच्या रेल्वे ट्रकवर गोवा राज्यातून कामगार आणून तेथील रुळ भरण्याचे काम सुरू हेते, याबाबत गाळवणकर तसेच झाराप येथील सामाजिक कार्यकर्ते राजू तेंडोलकर व अनिकेत तेंडोलकर यांनी तेथे जात कामगारांना विचारणा केली. गोव्यातील कामगार येथे आणताना रेल्वे प्रशासनाने येथील प्रशासनाची परवानगी घेतलेली नाही. एका राज्यातून दुसऱया राज्यात कुणीही परवानगीशिवाय जाऊच शकत नाहीत. येथील महसूल, आरोग्य विभागाला अंधारात ठेवून काम सुरू असल्याचा आरोपही गाळवणकर यांनी केला. या बाबत त्यांनी प्रांताधिकारी वंदना खरमाळे व तहसीलदार रवींद्र नाचणकर यांच्याशी चर्चा केली.
झाराप हद्दीत रुळ भरण्याचे काम सुरू असताना ग्रा. पं. किंवा आरोग्य विभागाला रेल्वे प्रशासनाने कल्पना दिली नाही. चार ते पाच कामगार काम करीत होते. त्यांची आरोग्य तपासणी करण्यात आलेली नाही. कोरोनाचे गांभीर्य नाही, अशाच अविर्भावात रेल्वे प्रशासन वागत आहे, अशी नाराजी राजू तेंडोलकर यांनी व्यक्त केली.