वार्ताहर / निपाणी
ममदापूर ग्रामपंचायतीसाठी 27 रोजी होणाऱया निवडणुकीकरीता प्रभाग 2 मधून आलेल्या आरक्षणानुसार पात्र एस. टी. उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. असा पात्र उमेदवार एकच असल्याने काँग्रेस आघाडीचा उमेदवार बिनविरोध निवडला जाणार हे स्पष्ट होते. पण यासाठी पात्र उमेदवाराला डावलण्याचे प्रयत्न करताना मंत्री व खासदारांनी अधिकाऱयांवर दबाव तंत्राचा वापर चालविला आहे. यासाठीच एक दिवस छाननी प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली असा आरोप युवा नेते उत्तम पाटील यांनी केला.
ममदापूर ग्राम पंचायतमध्ये एस. टी. आरक्षणावरुन सुरु असलेला वाद व एक दिवसाने अर्जाची छाननी करण्यासाठी पुढे ढकलण्यात आलेली प्रक्रिया याची माहिती देण्यासाठी घेतलेल्या पत्रकार बैठकीत ते बोलत होते. उत्तम पाटील पुढे म्हणाले, याच उमेदवाराची गेल्या कार्यकाळ भाजपा गटातून उमेदवारी दाखल केल्याने बिनविरोध निवड झाली होती. यावेळी मात्र त्यांनी उमेदवारी काँग्रेस आघाडीतून अर्ज दाखल केला आहे. यामुळे त्या पात्र ठरत नाहीत काय? असा सवाल केला.
माजी आमदार काका पाटील पुढे म्हणाले, लोकशाही व्यवस्थेत निवडणूक हे महत्त्वाचे अंग आहे. अशा प्रक्रियेत कोणीही अधिकाराचा गैरवापर करणे योग्य नाही. सध्या अधिकारी तन-मनाने प्रामाणिक काम करत आहेत. पण मंत्री व खासदार मात्र त्यांच्यावर दबाव आणत आहेत. शांतताप्रिय गावात दुफळी माजवून वाद वाढविण्याचा प्रयत्न होत आहे. याचा आम्ही निषेध करतो, असे सांगितले.
यावेळी निरंजन पाटील, महारुद्र स्वामी, रावसाहेब गोरवाडे, प्रकाश पाटील, मोहन पाटील, अरुण केनवडे, अमित शिंदे, अमित हरेल, महादेव मधाळे, पांडुरंग हरेल, सिताराम हरेल, बाळासाहेब गोरवाडे, शंकर इंगळे, गुंडा कोळी, संजय पाटील, गजानन कावडकर, संदीप तोडकर, कृष्णात चोपडे आदी उपस्थित होते.