पाच अर्ज अवैध : आता माघारीकडे लक्ष; प्रचारकार्याला वेग
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव लोकसभा पोटनिवणुकीसाठी एकूण 23 जणांनी अर्ज दाखल केले होते. यामधील पाच अर्ज अवैध झाल्यानंतर 18 जणांचे अर्ज वैध ठरले आहेत. बुधवारी अर्जांची छाननी झाली. यावेळी काही उमेदवार तसेच त्यांचे समर्थक उपस्थित होते. त्या सर्वांच्या समोरच या अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली.
अर्जांच्या छाननीनंतर अनेकांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. भाजपच्या उमेदवार मंगला सुरेश अंगडी, काँग्रेसचे आमदार सतीश जारकीहोळी, म. ए. युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, शिवसेनेचे के. पी. पाटील, अशोक पांडाप्पा हणजी, विवेकानंद बाबू घंटी, वेंकटेश महास्वामीजी, सुरेश मरलिंगण्णावर, आप्पासाहेब कुरणे, गुरुपुत्र कुळ्ळोर, नागाप्पा कळसण्णावर, बसवराज हुद्दार, भारती चिक्कनरगुंद, श्रीकांत पडसलगी, सुरेश बरगण्णावर, संगमेश चिक्कनरगुंद, हणमंत नागनूर या सर्वांचे अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत.
शनिवार दि. 3 एप्रिल रोजी अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस असून त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. दि. 17 एप्रिल रोजी मतदान होणार असून काही जणांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. अर्जांच्या छाननीवेळी अनेक जण वकिलांसह हजर होते. पोलिसांनीही जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवला होता.