सामाजिक सेवेची भावना उपजत हवी
मनीषा सुभेदार / बेळगाव
समाजसेवा ही शिकविली जात नाही. समाजासाठी आपण काहीतरी करायला हवे ही तळमळ उपजतच असावी लागते. सेवा करताना श्रीमंत, गरीब असा भेद नसतोच. शीतल भंडारी यांच्या बाबतीत असेच म्हणावे लागेल. सुखवस्तु, सधन घरातील महिला चाकोरीतच राहतात हा समज त्यांनी दूर केला आहे. अहमदनगरहून बेळगावला येऊन त्यांनी एका वेगळय़ाच पद्धतीने सामाजिक कार्य सुरू केले आहे.
शीतल या अहमदनगरच्या. त्या बी. कॉम. पदवीधर असून, फॅशन व ज्युवेलरी डिझाईनचा डिप्लोमा त्यांनी केला आहे. परिचितांतर्फे त्यांना बेळगावच्या मधुसुदन भंडारी यांचे स्थळ सांगून आले आणि 2003 मध्ये विवाह करून त्या बेळगावला आल्या. माहेरी सर्वांनाच समाजकार्याची आवड असल्याने अहमदनगर येथे लहान मुलांसाठी विनामूल्य कार्यशाळा घेणे, त्यांना सहलीला नेणे असे उपक्रम बहीण पायल यांच्या समवेत त्या करत असत. लग्नानंतर एकत्र कुटुंबात बरीच वर्षे पूर्णवेळ गृहिणी म्हणून त्या वावरल्या. परंतु आपल्याला मिळणाऱया फावल्या वेळेचा सदुपयोग करायला हवा, असे तीव्रपणे वाटत होते. आणि याच तीव्रतेतून त्या ‘केअर फॉर यूथ’ या संस्थात्मक उपक्रमात सक्रीय झाल्या.
‘केअर फॉर यूथ’ ही संस्था वंचित, अनाथ मुलांसाठी काम करते. त्यांची बहीण पायल राठी या अहमदनगर येथे याच संस्थेमध्ये कार्यरत आहेत. बहिणीच्या सहकार्याने शीतल यांनी बेळगावमध्ये केअर फॉर युथच्या कामाचा शुभारंभ केला. पाच-सहा वर्षांपूर्वी बेळगावला या संस्थेचा पहिला उपक्रम राबविताना विविध अनाथाश्रमातील सर्व मुलांना एकत्र करून त्यांच्यासाठी पूर्ण दिवस मनोरंजनाचे कार्यक्रम करून त्यांना आनंद दिला गेला. त्यानंतर याच मुलांकडून राखी तयार करून घेऊन त्यांची विक्री केली गेली. हा निधी मुलांसाठीच वापरला गेला.
दरवषी या मुलांना राखीसाठी साहित्य देऊन राख्या तयार करून घेतल्या जातात. अल्पदराने त्यांची विक्री होते आणि त्याच पैशातून मुले ज्या वस्तुची मागणी करतात ती त्यांना दिली जाते. यंदाच्या राखी पौर्णिमेला मुलींनी इमिटेशन ज्युवेलरीची मागणी केली आणि संस्थेने ती आनंदाने पुरविली.
लष्कराचे क्षेत्र हे अनेकांना खुणावते. लहान मुले त्याला अपवाद नाहीत. हेच लक्षात घेऊन याच सर्व मुलांना ‘केअर फॉर युथ’ने मराठा लाईट इन्फंट्रीची सफर घडवून आणली. शहरातील विविध अनाथाश्रमांना केअर फॉय युथ मदत करतेच, परंतु याच आश्रमातील दोन जणांचा विवाह करून देण्यामध्ये शीतल यांचा पुढाकार होता.
कोरोना काळात सिव्हिलमध्ये प्रसूती झालेल्या एका मातेकडे काहीही पैसे किंवा साहित्य नव्हते. गौरी गजबर यांच्याकडून ही बाब कळताच केअर फॉर युथने या महिलेसाठी भरघोस मदत केली. बाळाचे कपडे दिले. कोरोना काळात अनाथाश्रमा व्यतिरिक्त सर्वसामान्य अत्यंत गरीब अशा 100 मुलांना किट वाटप केले गेले.
बेळगावमधल्या सर्वच अनाथाश्रमांशी केअर फॉर युथ जोडली गेली आहे. पहिल्याच उपक्रमामध्ये शांताईमधील वृद्धांना संस्थेने असोगा सहल घडवून आणली. तेथे त्या वृद्धांचा फॅशन शो झाला. हा आपल्या जीवनातील संस्मरणीय क्षण होता, असे जेव्हा ज्ये÷ांनी सांगितले तेव्हा आपल्या प्रयत्नांचे सार्थक झाले, असे आम्हा सर्वांना वाटले, अशी नोंद शीतल करतात.
अनाथाश्रमातील मुलांची जबाबदारी काटेकोरपणे घ्यावी लागते. आमच्यावर विश्वास असल्याने संस्थाचालक मुलांना आमच्या सोबत पाठवितात. वृद्धाश्रम असोत, अनाथाश्रम असोत, ज्ये÷ांना, मुलांना प्रेम आणि वेळ मिळणे आवश्यक आहे. समाजकार्य करण्यासाठी बाहेर पडणे आवश्यक आहे असे नाही. आमच्याकडे असलेल्या उपलब्ध वेळेमध्ये या घटकांसाठी काम करणे शक्मय आहे. आज आपल्या समवेत अनेक महिला जोडल्या गेल्या आहेत. त्यांना सामाजिक कार्याची जाणिव झाली आहे. हे महत्त्वाचे आहे. असे त्या म्हणतात.
आज ‘केअर फॉर युथ’चे काम बेळगाव, अहमदाबाद, पुणे, नाशिक, इंदोर येथे चालते. समाजात देणारे खूप आहेत. फक्त त्यांचे दान सत्कारणी लागावे ही भावना असते. शीतल यांच्या कार्यावर विश्वास असल्याने समाजातून देणग्या पुढे येतात. हे काम माझे एकटीचे नाही. मी आणि माझ्या अनेक गृहिणी असणाऱया मैत्रिणी हे काम करतो आणि आम्हाला आनंद मिळतो, असे त्या म्हणाल्या.
बेळगावमधील अनेक व्यक्तींनी केअर फॉर युथला मदत केली आहे. रोटरीने केअर फॉर युथच्या मुलांना व्यासपीठ दिले आहे. रोटरी अन्नोत्सवमध्ये दरवषी या मुलांना त्यांचे कलागुण सादर करण्यासाठी व्यासपीठ मिळते. शिवाय मुलांच्या भोजनाची जबाबदारीसुद्धा रोटरी घेते. या मुलांना बाहेरच्या जगाचे कुतूहल असते. त्यांना या जगाची ओळख करून देणे महत्त्वाचे आहे, असे शीतल यांना वाटते.