विजय बेदी, वन्यजीव चित्रपटकर्ते यांचे मत
ऑनलाईन टीम / पुणे :
वन्यजीवांवरील लघुपटांच्या माध्यमातून आपण धोरणकर्त्यांना निश्चितपणे दिशा देऊ शकतो. कारण या माध्यमातून वन्यजीवांच्या वास्तव स्थितीचे चित्रण होत असते, असे मत दिल्ली येथील चित्रपटकर्ते आणि यंदाच्या वसुंधरा मित्र पुरस्काराचे मानकरी विजय बेदी यांनी व्यक्त केले.
14 व्या किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवानिमित्त विजय बेदी यांच्या विशेष वार्तालापाचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी सुप्रिया चित्राव उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना विजय बेदी म्हणाले की, वाघ, सिंह, हत्ती अशा मोठय़ा प्राण्यांच्या संवर्धना संदर्भात शासकीय पातळीवर अनेक नियम आणि अटी आहेत. मात्र, भारतात किंवा महाराष्ट्रात जे छोटे छोटे प्राणी आहेत की, जैवविविधतेच्या चक्रात ज्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे, त्यांचे संवर्धन करण्या संदर्भात पुरेसे गांभीर्य बाळगले जात नाही. यासंदर्भातही शासनाने योग्य त्या धोरणांची आखणी करण्याची गरज आहे. आम्ही अशा प्रजाती निवडून त्यावर लघुपट तयार करणार आहोत.
वन्यजीवांवरील लघुपट हे केवळ मनोरंजनासाठी नसून त्यातून जागृती निर्माण व्हावी, हा अधिक महत्त्वाचा आणि मुख्य उद्देश असतो. रेड पांडावर मी बनविलेल्या लघुपटासाठी मला ग्रीन ऑस्कर पासून अनेक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानाचे पुरस्कार मिळाले. रेड पांडाच्या संवर्धनासाठी त्या लघुपटाचे फुटेज खूप महत्त्वाचे ठरले. मात्र, वन्यजीवांवरील लघुपटांची निर्मिती करण्यासाठी प्रचंड संयम आणि कष्ट या दोन्हीची योग्य सांगड घालावी लागते, असेही विजय बेदी यांनी यावेळी नमूद केले.