नोकरी किंवा व्यवसाय करणार्या महिलांवर कामासोबतच घराचीही जबाबदारी असते. या जबाबदार्या त्यांना यशस्वीपणे पारही पाडायच्या असतात. यात त्यांची धांदलही उडत असते. मात्र या दोन्ही जबाबदार्या पार पाडणं म्हणजे तारेवरची कसरत. पण कोणत्या गोष्टीला कधी प्राधान्य द्यायचं हे तुम्हाला ठरवता आलं पाहिजे. वर्क-लाईफ बॅलन्स कसं साधायचं याविषयी…
- काम आणि घर अशा दोन्ही जबाबदार्या सांभाळणं वाटतं तितकं कठीण नाही. मात्र यासाठी योग्य नियोजन आवश्यक आहे. हातातल्या वेळेचा सदुपयोग खूप महत्त्वाचा असतो. म्हणूनच वेळ वाया न घालवता कामं करण्यावर भर द्या. रोजचं नियोजन करून त्यानुसार कामं केल्यास तुम्हीही निवांत राहू शकता.
- आपले प्राधान्यक्रम ठरवा. समजा ऑफिसमध्ये तुमच्यावर नवीन जबाबदारी आली असेल आणि घरात सगळं काही सुरळीत असेल तर कामाकडे जास्त लक्ष द्या. तसंच मुलं आजारी असतील किंवा परीक्षेचा काळ असेल तर सुटी घेऊन किंवा कामाची जबाबदारी थोडी कमी करून घराला वेळ द्या.
- दुसर्या दिवशीची काही कामं आदल्या दिवशी करता येणं शक्य असेल तर ती उरकून टाका. फावल्या वेळात काही कामं करता येतील. पतीची किंवा घरातल्या ज्येष्ठांची मदतही घेता येईल. कामांची वाटणी करता येईल. काही कामं मुलांनाही देता येतील.
- स्वतःसाठी तसंच कुटुंबासाठी वेळ काढा. दिवसातला किमान अर्धा तास तरी स्वतःला द्या. जोडीदाराशी मोकळेपणाने बोला. तुमच्या समस्या, अडचणी सांगा. हे सगळं करताना मानसिक आरोग्याकडेही लक्ष द्या.नियमित व्यायाम आणि ध्यानधारणेने तुम्हाला बरं वाटेल.