शेतकऱ्यांची दिवाळी होणार गोड
औंध / प्रतिनिधी
यंदाच्या गळीत हंगामाची लवकर सुरवात करून आघाडी घेतलेल्या वर्धन अॅग्रो साखर कारखान्याने चालू हंगामातील गळीतास आलेल्या उसाचा पहिला हप्ता २४०० रुपये प्रति टन प्रमाणे पहिल्या पंधरवड्याचे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग करण्यात आल्याची माहिती चेअरमन धैर्यशील कदम यांनी दिली.
कदम म्हणाले की वर्धन अॅग्रो हा सभासद शेतकऱ्यांचा कारखाना असून या वर्षी कारखान्याने गळीत हंगाम लवकर सुरू केला आहे. वर्धनवर लोकांचा विश्वास कारखान्यावर असल्याने मोठ्या प्रमाणावर ऊसाची आवक कारखान्यास होत आहे.
या गळीत हंगामातील पहिल्या पंधरवड्याचे ऊस बील शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग केले आहे. दिवाळीपूर्वी बील खात्यावर जमा झाल्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मध्ये समाधानाचे वातावरण आहे. लवकरच दुसऱ्या पंधरवड्याचे बिल सुद्धा वर्ग करण्यात येईल. सभासद शेतकऱ्यांनी ठेवलेल्या विश्वासाला कारखाना पात्र होतोय याचे समाधान आहे. निश्चित चांगला दर देण्यासाठी कारखाना बांधील असून सगळ्यांच्या तुलनेत चांगला दर देण्याची ग्वाही धैर्यशील कदम यांनी दिली.
महाराष्ट्राच्या कारखानदारीतील वेगळा प्रयोग राबविताना लोकांनी ठेवलेल्या विश्वासामुळे कारखाना अगोदर चालू करता आला. उत्पादित मालाला चांगली मागणी आहे. डी मार्ट ,पतंजली सारखे मोठे ब्रॅन्ड आपल्या मालाला मोठया प्रमाणावर मागणी करत आहेत त्यामुळे चांगला दर देण्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही.