ऑस्ट्रेलियातील यंदाची टी-20 विश्वचषक स्पर्धा 2022 पर्यंत लांबणीवर पडण्याचे संकेत,
ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये आयपीएल होण्याची दाट शक्मयता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती (आयसीसी) कार्यकारिणीची आज (दि. 28) महत्त्वपूर्ण बैठक होत असून त्यात प्रामुख्याने यंदाच्या टी-20 विश्वचषक स्पर्धेबाबत निर्णय घेतला जाणार आहे. आजची ही बैठक टेलिकॉन्फरन्सवरुन होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ही विश्वचषक स्पर्धा 2022 पर्यंत लांबणीवर टाकली जाण्याची शक्यता असून तसे झाल्यास ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये टी-20 वर्ल्डकपऐवजी आयपीएल खेळवली जाणार आहे.
कोव्हिड-19 च्या महासंकटामुळे सर्वच क्रीडा स्पर्धांचे वेळापत्रक बिघडून गेले असून क्रिकेटही त्याला अजिबात अपवाद राहिलेले नाही. त्या पार्श्वभूमीवर, यंदा ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये आयोजित टी-20 विश्वचषक स्पर्धा होण्याबाबत यापूर्वीपासूनच साशंकता होती. त्यावर आजच्या बैठकीत शिक्कामोर्तब होऊ शकेल, असे संकेत आहेत.
‘टी-20 विश्वचषक स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय आजच्या बैठकीत होण्याची बरीच शक्यता आहे’, असे आयसीसी कार्यकारिणीतील सूत्राने गोपनियतेच्या अटीवर सांगितले. ‘सध्याच्या स्थितीत टी-20 विश्वचषक नियोजित रुपरेषेनुसार भरवले जाण्याची शक्यता खूपच कमी आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया किंवा अन्य कोणतेही मंडळ ही स्पर्धा लांबणीवर टाकण्याच्या निर्णयावर हरकत घेणार नाही’, असा दावा या सूत्राने केला.
यंदाची विश्वचषक स्पर्धा लांबणीवर टाकली जाण्याची शक्यता आहे, असे वृत्त वृत्तसंस्थेने 15 मे रोजी दिले होते. ख्रिस टेटली यांच्या नेतृत्वाखालील आयसीसी इव्हेंट्स कमिटी काही पर्याय सादर करेल आणि त्यानुसार भारतातील 2021 ची विश्वचषक स्पर्धा व ऑस्ट्रेलियातील यंदाची टी-20 विश्वचषक स्पर्धा यांची अदलाबदल केली जाऊ शकेल, असेही त्या वृत्तात म्हटले होते. अर्थात, यंदाची स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय संमत झाला आहे, अशा आशयाचे वृत्त आयसीसी प्रवक्त्याने स्पष्टपणे फेटाळून लावले.
ब्रॉडकास्टर्सचाही विचार
आयसीसीला केवळ सहभागी देशांचा नव्हे तर स्पर्धेचे ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सचा देखील विचार करावा लागेल, असे या सूत्राने नमूद केले. योगायोगाने आयसीसी इव्हेंट्स व भारतातील क्रिकेट स्पर्धांचे प्रसारण हक्क स्टार स्पोर्ट्सकडेच आहेत.
केंद्र सरकार परिस्थिती पूर्वपदावर आणण्याकडे भर देत आहे. त्यामुळे, पाच आठवडय़ांच्या आयपीएलला हिरवा कंदील दर्शवला जाईल, अशी चिन्हे आहेत.
क्वारन्टाईनची सक्ती राहणार
दौऱयापूर्वी खेळाडूंना 14 दिवस क्वारन्टाईन रहावे लागेल, हे देखील जवळपास निश्चित आहे. कोव्हिड-19 संकटाचा समूळ नायनाट झाला नाही, किंबहुना नियंत्रण ठेवता आले नाही तर अशा परिस्थितीत सामने आयोजित केले जात असताना खेळाडूंना क्वारन्टाईन रहावे लागेल. याचाच अर्थ असा की, ऑस्ट्रेलिया दौऱयात क्वारन्टाईन रहावे लागणार असेल तर पहिली कसोटी खेळण्यापूर्वी 3 आठवडे आधीच भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात दाखल व्हावे लागणार आहे.
आयसीसी कार्यकारिणी बैठकीतील महत्त्वपूर्ण मुद्दे
@टी-20 विश्वचषकाबाबत निर्णय घेणे
@ब्रॉडकास्टर वाहिनी स्टार स्पोर्ट्सच्या अडचणींची चर्चा
@नवा अध्यक्ष निवडण्याची प्रक्रिया निश्चित करणे
@2021 टी-20 वर्ल्डकपला कर सवलतीबद्दल चर्चा करणे
करप्रणालीबाबत विस्तृत चर्चा होणार
भारतात 2021 मध्ये होणाऱया टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर अपेक्षित कर सवलत मिळावी, यासाठी आयसीसी आग्रही असून हा या बैठकीतील कळीचा मुद्दा ठरु शकतो. तूर्तास, भारतात सध्या लॉकडाऊन सुरु असल्याने केंद्राकडून चित्र स्पष्ट होईतोवर बीसीसीआयने अधिक वेळ मागून घेतला आहे. 2016 टी-20 विश्वचषकातील कर सवलतीचा मुद्दा यापूर्वीच लवादाकडे पोहोचला आहे. पण, ज्यावेळी देशातील सध्याच्या कर पद्धतीचा प्रश्न येईल, त्यावेळी त्यात दस्तुरखुद्द भारतीय क्रिकेट नियामक मंडळ देखील काहीही करु शकणार नाही, हे स्पष्ट आहे.
अध्यक्ष निवड प्रक्रियेबद्दलही चर्चा होणार
आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष शशांक मनोहर यांचा उत्तराधिकारी निश्चित करण्यासाठी निवड प्रक्रियेबद्दल या बैठकीत चर्चा होणे अपेक्षित आहे. सध्याच्या घडीला इंग्लंड व वेल्स क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष कॉलिन ग्रेव्हज अध्यक्षपदासाठी आघाडीवर आहेत. पण, ऐन मोक्याच्या क्षणी सौरभ गांगुली यांनी आयसीसी अध्यक्षपद निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली तर सारेच चित्र बदलून जाऊ शकते. तूर्तास, बीसीसीआयने याबाबत काहीही रितसर घोषणा केली नसली तरी खजिनदार अरुण धुमल यांनी गांगुली यांच्यात आयसीसी अध्यक्ष होण्याची क्षमता आहे, असे संकेत दिले आहेत.