फोंडा: आपले अधिकार मिळवण्यासाठी नेहमीच लढा द्या. एकविसाव्या शतकातही महिलांपुढे अनेक आव्हाने आहेत. आज महिलांकडे पैसा व स्वातंत्र्य आहे. त्याचा उपयोग समाजात चांगल्या कार्यासाठी करा असे उद्गार निर्मात्या आणि लेखिका ज्योती कुंकळकर यांनी काढले.
बांदोडातील संजीवन संस्थेने महिला दिनाचे औचित्य साधून आयोजित केलेल्या ’’21 व्या शतकातील महिलांसमोर आव्हाने ’’ या विषयावरील चर्चासत्रात त्या बोलत होत्या. हा कार्यक्रम संस्थेच्या परिषदगृहात झाला.
यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्ष डॉ. विद्या गावडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. व्यासपीठावर रवींद्र भवनच्या सदस्य सचिव संध्या कामत, समाज कार्यकर्त्या लालन केरकर, ग्रामीण विकास यंत्रणेच्या संचालिका मीना गोलतेकर, संजीवन संस्थेच्या अध्यक्ष आशा सावर्डेकर, संस्थेच्या नीला बोरकर, धेंपे महाविद्यालयाच्या प्राचार्य राधिका नायक व इतर मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. गावडे म्हणाल्या की महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक कायदे आहेत, पण त्याची जाणीवच त्यांना नाही. त्यामुळे महिलांनी जागरुक असले पाहिजे. गोव्यातही महिलांवर अत्याचार होतात, मात्र केवळ 20 टक्के प्रकरणे महिला आयोगापर्यंत येतात.
यावेळी संस्थेतर्फे समाजात विविध क्षेत्रांमध्ये उत्कृष्ट काम करणाऱया महिलांचा सन्मान करण्यात आला. संध्या कामत, ज्योती कुंकळकर, लालन केरकर, मीना गोलतेकर, राधिका नायक, डॉ. लालन बखले, ज्योती ढवळीकर, डॉ. स्मिता पार्सेकर, डॉ. नूतन देव, अंजू जयचंद्र, गीताली तळावलीकर, डॉ. वंदना पाटणकर, वंदना तेंडुलकर, सविता डिकॉस्ता, स्मिता कामत, श्रीमी पाणंदीकर यांचा डॉ. विद्या गावडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
मीना गोलतेकर म्हणाल्या, महिलांनी अन्याय सहन करत राहू नये, त्याविरुद्ध आवाज उठवावा. तसेच महिलांनी आर्थिकदृष्टय़ा स्वावलंबी व्हावे.
राधिका नाईक म्हणाल्या, आपण मुला मुलींमध्ये भेदभाव करणे सोडायला हवे. महिलांना समान दर्जा देण्यासाठी महिलांनीच पुढाकार घ्यावा. संध्या कामत यांचेही भाषण झाले.आशा सावर्डेकर यांनी स्वागत केले तर नीला बोरकर यांनी आभार मानले. सूत्रसंचालन विद्या टेंगसे यांनी केले .