प्रतिनिधी / कागल
कोरोना’ च्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या मास्कचा विषय सर्वत्र ऐरणीवर आला आहे. वापरलेले मास्क मोठ्या प्रमाणावर बेदरकारपणे रस्त्यावर फेकून दिले जात आहेत. मुळातच नागरिकांनी वापरलेले मास्क कुठे टाकावेत असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण झाला आहे. त्यासाठी मास्कची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. याची जबाबदारी सर्वस्वी नागरिकांची आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर घराबाहेर पडताना मास्क वापरणे बंधनकारक झाले आहे. तर मास्क न वापरणाऱ्यावर नगरपालिकेने दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. या नवीन लाईफ स्टाईलची आता सवयच करून घ्यावी लागणार आहे. कोरोनामुळे काही दिवसांमध्ये विविध पक्ष, सामाजिक संघटना, मंडळांनी विविध भागांमध्ये जाऊन मोठ्या प्रमाणात सर्जिकल मास्कचे वाटप केले आहे. मात्र वापरानंतर त्याची योग्य पद्धतीने विल्हेवाट लावली पाहिजे. प्रत्येक रुग्णालयातून निघणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था आहे. मात्र घरांमध्ये वापरून झालेल्या मास्क कसा आणि कुठे टाकावा हा प्रश्न नागरिकांसमोर उभा आहे. त्यामुळे अनेक नागरिक मास्क वापरून कचऱ्यात टाकत आहेत. तर काही जण रस्त्यावर टाकून रिकामे होत आहेत. अशाप्रकारे कचरा अथवा रस्त्यावर वापरलेले मास्क टाकले म्हणजे कोरोनाला आमंत्रण देण्यासारखे असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे आता घराघरातुन निघणारे मास्क गोळा करण्यासाठी घंटागाडी वर वेगळा डबा पिशवी ठेवण्याची गरज आहे .
शहर आणि ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक वापरलेले मास्क रस्त्यावर अथवा कचऱ्यात टाकून देतात. त्यामुळे होणार्या दुष्परिणामांना बाबत संबंधित नगरपालिका आणि ग्रामपंचायतीने नागरिकांना तशा सूचना देणे गरजेचे आहे.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रत्येकाने मास्क वापरणे अनिवार्य असले तरी तो इतरत्र टाकता कामा नये. वापरलेला मास्क जमिनीत पुरण्यासह त्याला जंतू विरहित करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. अन्यथा धोका अटळ आहे. :- डॉ. श्रेयश जुवेकर तालुका वैद्यकीय अधिकारी