वार्ताहर / खोची
गेले चार दिवस पडत असलेल्या परतीच्या जोरदार पावसामुळे खोची परिसरात हाहाकार माजला आहे. या पावसाच्या पाण्यामुळे या भागातून वाहत असलेल्या वारणा नदीच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर-सांगली सांगली जिल्ह्यांना जवळून जोडणाऱ्या खोची-दुधगाव बंधाऱ्यावर पाचव्यांदा पाणी येऊन हा बंधारा वाहतुकीसाठी बंद झाला आहे. पर्यायी मार्ग वाहतूक सुरू झाली आहे. दरम्यान या पाण्यामुळे नदीकाठची पिके पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. भैरवनाथ मंदिर, स्मशानभूमी परिसरात नदीचे पाणी पसरले आहे. पाणीपातळीत मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत होती.
बुधवारी रात्री पडलेल्या जोरदार पावसामुळे गुरुवारी सकाळी भेंडवडे येथील लक्ष्मी ओढ्याच्या पाणीपातळीत प्रचंड वाढ होऊन पाणी हनुमान मंदिर चौकात रस्त्यावर येवून, तसेच खोची-भेंडवडे, खोची-बुवाचे वठार-नरंदे या मार्गावर पावसाचे प्रचंड पाणी येवून वाहतूक बंद झाली होती. दरम्यान या पावसामुळे घोडावत कारखान्यासाठी सुरू असलेल्या ऊस तोडी पूर्ण बंद पडल्या असून ऊसतोडणी मजूरांचे निवार्या अभावी मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. त्यांना निवारा शोधावा लागत आहे.
या जोरदार पडत असलेल्या परतीच्या पावसामुळे बळीराजाचे भात, सोयाबीन, भुईमूग, जनावरांचा चारा, ऊस आदी पिकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. भात, सोयाबीन, भुईमूग ही पिके पाण्यातच आहेत. बळीराजाला जनावरांच्या वैरणीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. अचानक पाणीपातळीत प्रचंड वाढ झाल्याने नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांचे वीज पंप पाण्यात बुडून नुकसान झाले आहे.