मिलिंद नाईक यांच्या व्यवसायापोटी वास्को पणाला : संकल्प आमोणकर यांचा आरोप
प्रतिनिधी/ पणजी
वास्को लॉकडाऊन केले असते तर आज ही स्थिती निर्माण झाली नसती. कोरोनामुळे मृत पावलेल्या 11 रुग्णांपैकी 6 रुग्ण वास्कोचे आहेत. मांगोरहिल येथे लागण झाल्यानंतर आपण व मुरगाव तालुक्यातील तीन आमदार, नगरसेवक यांनी लॉकडाऊनची मागणी केली होती. सरकारने ही मागणी ऐकली असती तर आज वास्कोत ही स्थिती निर्माण झाली नसती, असे काँग्रेस नेते संकल्प आमोणकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
मांगोरहिल येथे पहिला रुग्ण सापडल्यानंतर आपण लॉकडाऊनची मागणी केली होती. मुरगावच्या तालुक्यातील चारपैकी तीन आमदारांनी लॉकडाऊनची मागणी केली होती. मुरगाव नगराध्यक्षांसह अन्य नगरसेवकांनी ही लॉकडाऊनची मागणी केली होती.
मिलिंद नाईक यांनाच लॉकडाऊन नको
तालुक्यातील अन्य तीन आमदार मुरगावचे नगरसेवक वास्को लॉकडाऊनची मागणी करीत असताना मुरगावचे आमदार व मंत्री मिलिंद नाईक मात्र गप्प होते. कारण त्यांना स्वतःचा धंदा बंद झालेला नको होता. त्यांना लोकांपेक्षा स्वतःचा धंदा महत्वाचा होता. सरकारने व मिलिंद नाईक यांनी स्वतःचा स्वार्थ पाहिला, असा आरोप आमोणकर यांनी केला.
कंटेनमेंट झोनचा सरकारकडून दिखावा
सरकार कंटेनमेंट झोन, बफरझोन जाहीर करून एक दिखावा करीत आहे, पण प्रत्यक्षात तिथे सरकारचे काहीच काम चालत नाही. 16 जून रोजी या भागात मायक्रो कंटेनमेंट झोन केला होता. त्यानंतर 19 रोजी 60 लोकांची चाचणी केली. केली व 20 रोजी 80 लोकांची चाचणी केली. केवळ 140 लोकांची चाचणी केली. 2400 लोकांची वस्ती आहे. त्यापैकी 140 जणांची चाचणी केली. त्यानंतर जी चाचणी बंद झाली ती आजपर्यंत सुरू झालेली नाही, अशी टीका त्यांनी केली. मांगोरहिल येथे सगळय़ांची चाचणी करा, अशी मागणी होत आहे, पण केली जात नाही. आम्ही स्वेच्छेने चाचणी करायची तयारी दर्शविली, तर अधिकारी सांगतात लक्षणे दिसत नाहीत तोपर्यंत चाचणी केली जाणार नाही.
लोकांना सध्या कुटुंबाच्या सुरक्षेची भीती वाटत आहे. त्यामुळे लोक इस्पितळात चाचणी करायला जातात, पण तिथे चाचणी केली जात नाही. सरकारने चाचण्या करण्याचे आश्वासन दिले होते. ते पाळले का जात नाही, असा प्रश्नही त्यांनी केला.
कंटेनमेंट झोनमध्ये कडधान्य मिळत नाही. लोकांचे हाल होत आहेत. औषधे मिळत नाहीत. वॉर्ड क्र. 4 सडा येथील लोक धान्य, औषधे आणायला जातात, पण दुकानदार त्यांना जवळ घेत नाहीत, अशी स्थिती झालेली आहे. लॉकडाऊन करणे अत्यंत आवश्यक आहे व सरकारने लॉकडाऊन करावे, अशी मागणीही त्यांनी केली. मुरगावच्या आमदाराच्या हितासाठी व धंदा सांभाळण्यासाठी सरकार लॉकडाऊन करायला तयार नाही. कारण पोर्ट बंद झाला तर व्यवसाय बंद होणार. सरकारकडे मागणी आहे की, पोर्ट सुरू ठेऊन मिलिंद नाईक यांचा व्यवसाय सुरू ठेवा, पण वास्को लॉकडाऊन करा, अशी मागणी संकल्प आमोणकर यांनी केली.