प्रतिनिधी /वास्को
वास्को शहरातील भर बाजारात रविवारी दुपारी वृक्ष कोसळून सात वाहने चिरडली. यात दुचाकी व चार चाकी वाहनांचा समावेश आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाला नाही. मात्र, वाहनांची मोठय़ा प्रमाणात हानी झाली.
वास्को शहरातील अनेक धोकादायक वृक्षांपैकी एक असलेला गुलमोहराचा वृक्ष रविवारी दुपारी बाराच्या सुमारास कोसळला. शहरातील भाजी मार्केट समोरच्या रस्त्यावर हा धोकादायक वृक्ष होता. या ठिकाणी वाहने खचाखच पार्क केलेली असतात. तसेच काही विक्रेतेही या रस्त्याच्या दोन्ही बाजुला बसलेले असतात. रविवार असल्याने बाजारात रोजच्यापेक्ष जास्तच गर्दी होती. या गर्दीच्या वेळीच गुलमोहराचा वृक्ष कोसळला. सुदैवाने कुणी पादचारी किंवा वाहन चालक या वृक्षाखाली आला नाही. मात्र, विरूध्द बाजुला पार्क केलेली सात वाहने पूर्णपणे चिरडली गेली. यात चार चाकी वाहनांचाही समावेश आहे. त्यामुळे या घटनेत लाखोंची नुकसानी झाली. दरवर्षी प्रमाणे पुढील दोन दिवसांत या ठिकाणी चतुर्थीचा बाजारही भरणार आहे. तत्पूर्वीच ही घटना घडल्याने मोठे संकट टळले आहे.
वृक्ष कोसळताना वीज वाहीन्याही तुटून पडल्या. वृक्ष कोसळल्यानंतर वृक्षाखाली कोणी चिरडला असावा या शक्यतेने प्रथम सर्वांचीच भितीने तारांबळ उडाली. मात्र पाहणीनंतर वृक्षाखाली कुणी नसल्याने दिसून आले. या घटनेची माहिती मिळताच वास्को पोलीस व अग्नीशामक दल घटनास्थळी दाखल झाले. वीज कर्मचाऱयांनीही कामाला सुरवात केली. संध्याकाळी साडे तीन वाजेपर्यंत अग्नीशामक दलाने वृक्ष कापून रस्ता मोकळा केला. वीज पुरवठा सुरळीत करण्याचे काम मात्र संध्याकाळी उशिरापर्यंत चालू होते. या घटनेमुळे शहराच्या मध्यवर्ती भागात संध्याकाळपर्यंत वीज पुरवठा खंडीत होता.
वृक्षांच्या धोक्याबाबत पालिका मंडळ गंभीर नसल्याचा दाजी साळकर यांचा आरोप
वृक्ष कोसळून झालेल्या हानी प्रकरणी वास्को शहराचे माजी नगरसेवक कृष्णा उर्फ दाजी साळकर यांनी मुरगाव पालिकेला जबाबदार धरले आहे. आपल्याला त्रास देण्यासाठी पालिका राजकारण करीत असून याचे परीणाम जनतेला भोगावे लागत आहे असे साळकर यांनी म्हटले आहे. यापूर्वी वास्कोत वृक्षाखाली सापडून एका युवकाचा मृत्यू झालेला आहे. भविष्यात पुन्हा असा प्रकार घडल्यास आपण पालिकेविरूध्द खूनाचा खटला दाखल करू असा ईशारा साळकर यांनी दिला आहे. साळकर यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार रविवारी भर बाजारात कोसळलेल्या धोकादायक वृक्षाबाबत त्यांनी दहा वेळा पालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. मात्र, आपल्या तक्रारींकडे सतत दुर्लक्ष करण्यात आले. आपण स्वखर्चाने तो वृक्ष कापण्याची तयारी दर्शवली होती. त्यालाही परवानगी देण्यात आली नाही. आजही अनेक धोकादायक वृक्ष शहरात असून ते कोणत्याही क्षणी कोसळू शकतात. पुन्हा कुणाच्या तरी जीवावर बेतू शकते. परंतु पालिका या धोक्याबाबत गंभीर नाही. पालिका मंडळ केवळ राजकारणात गुंतलेले असून लोकांच्या जीवाशी खेळून कुणी राजकारण करू नये असे स्पष्ट करून साळकर यांनी मुरगाव पालिका मंडळ त्वरीत बरखास्त करून या मंडळावर प्रशासक नेमणेच योग्य असल्याचे म्हटले आहे.