उद्योग-व्यवसायातील बदलता काळ आणि कामकाजानुसार विविध क्षेत्रातील उद्योगांमध्ये महिलांची संख्या आणि त्यांच्या कामाचे स्वरुप यामध्ये गुणात्मक व लक्षणीय स्वरुपात वाढ झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये उत्पादक क्षेत्रातील कंपन्यांनी विशेष प्रयत्न आणि पुढाकार घेतला आहे. त्यातही नेस्ले, आयटीसी, कोका-कोला, डियॅपिओ, वेदांता यासारख्या प्रमुख कंपन्यांनी विशेष उल्लेखनीय प्रयत्न केले आहेत. परिणामी त्यांचे अनुकरण विविध उद्योगांमध्ये करण्यात येत असून त्याचा तपशील पुढीलप्रमाणे-
विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे नेस्ले इंडिया कंपनीने कंपनीच्या गुजरातमधील सानंद येथील कारखान्यामध्ये 60 टक्के महिला कर्मचाऱयांची नेमणूक करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. सद्यस्थितीत एखाद्या कंपनीत महिला कर्मचाऱयांची नेमणूक एवढय़ा मोठय़ा संख्येत करण्याचा हा उपक्रम नवीन व अभिनव ठरला आहे.
उद्योग-व्यवसायातील तज्ञांच्यानुसार यापूर्वी कंपनीत संचालक-व्यवस्थापक वा अधिकारी पदावर महिलांची नेमणूक केली जात असे. विशेषतः कंपनी स्तरावर सर्वोच्च अशा संचालक मंडळावर महिलांची नेमणूक करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी ‘सेबी’सारख्या शीर्षस्थ संस्थांनी पुढाकार घेतला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळू लागला. मात्र, कंपनी-उत्पादन क्षेत्रात महिलांची मोठय़ा संख्येत नेमणूक होण्याची उत्साहवर्धक उदाहरणे आता पुढे येत आहेत हे विशेष.
यासंदर्भात कोका-कोलाच्या धोरणानुसार कंपनीने गेली काही वर्षे त्यांच्या उत्पादन-प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर फार मोठय़ा प्रमाणावर सुरू केला आहे. या यांत्रिक कार्यपद्धतीमुळे कंपनीच्या उत्पादन कामात सुलभता आली आहे. परिणामी कंपनीने त्यांच्या विविध विभागांमध्ये महिलांची निवड-नेमणूक करण्यास प्राधान्य दिले आहे. परिणामी कोका-कोलामधील महिला कामगारांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. कंपनी व्यवस्थापनानुसार सद्यस्थितीत त्यांच्या गुजरातच्या कारखान्यात महिलांची टक्केवारी 45 टक्के असून सिलीगुडी येथील प्रस्तावित कारखान्यात महिला कामगारांचे प्रमाण 60 टक्केवर नेण्याचा कंपनीचा मानस आहे.
ग्राहकोपयोगी उत्पादन क्षेत्रात काम करणाऱया आयटीसी कंपनीने यासंदर्भात उल्लेखनीय काम केले आहे. कंपनीच्या दक्षिण भारतातील कारखान्यांच्या संदर्भातच सांगायचे झाल्यास आयटीसीच्या तामिळनाडू व कर्नाटक राज्यांमधील कारखान्यांमध्ये सध्या महिला कामगार बहुसंख्य आहेत तर आयटीसीच्या म्हैसूरमधील कारखान्यात महिला कामगार तर तीन पाळय़ांमध्ये काम करू लागल्या आहेत. महिला कामगारांच्या संदर्भातील हे बदल मोठे आणि लक्षणीय ठरले आहेत.
ऍल्युमिनियम उत्पादन क्षेत्रात काम करणाऱया वेदांता या कंपनीने तर कंपनीत महिलांची संख्या वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू केले आहेत. कंपनीच्या उत्पादन विभागात काम करणे व त्यासाठी प्रसंगी खाणीत काम करणे हे अवघड समजले जाते. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱया महिलांची संख्या आधी नगण्यच असायची. या आव्हानात्मक परिस्थितीत वेदांता कंपनीने महिला कर्मचाऱयांची निवड-नेमणूक करण्यास योजनापूर्वक सुरुवात केली. त्यासाठी प्रयत्नदेखील केले. परिणामी आज कंपनीतील महिला कर्मचाऱयांची संख्या 30 टक्केवर गेली आहे. वेदांता उद्योग समूहातील ईएसएल स्टील कंपनीत तर आज पोलाद उत्पादन क्षेत्रात अत्यंत अवघड समजल्या जाणाऱया फर्नेस विभागातसुद्धा महिला तंत्रज्ञ काम करण्यासारखे आक्रित घडले आहे. आता कंपनीच्या कास्टिंग विभागातही महिलांची नेमणूक केली गेली आहे.
वाहन-उपकरणे उत्पादन क्षेत्रातदेखील महिला कर्मचाऱयांनी आघाडी घेतलेली दिसून येते. काही ठिकाणी तर महिला कर्मचाऱयांकडे महत्त्वाची जबाबदारी दिल्याचे दिसून येते. यासंदर्भात विशेष व उल्लेखनीय बाब म्हणजे एमजी मोटर्स कंपनीच्या हलोल-गुजरात येथील कारखान्यातून 50 हजारावा ट्रक्टर बाजारात आणला गेला. 50 हजार ही आकडेवारी महत्त्वाची आहेच, पण मुख्य म्हणजे या विशेष ट्रक्टरचे संपूर्ण उत्पादन महिला तंत्रज्ञ-अभियंत्यांनी केले आहे. ही बाब उत्पादन-उद्योग क्षेत्रातील एकूणच महिलांसाठी अभिमानास्पद ठरली आहे.
वाहन उद्योग क्षेत्रात अग्रणी अशा टाटा मोटर्स, महिंद्र अँड महिंद्र, एमजी मोटर्स, डॅमलर इंडिया, मदरसन ग्रुप, टोयाटो यासारख्या कंपन्या महिलांची निवड करण्यासाठी नव्या संदर्भात प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नांना यशदायी प्रतिसाद लाभत आहे. परिणामी आज एमजी मोटर्स कंपनीमध्ये सुमारे 380 महिला तंत्रज्ञ-कर्मचारी काम करीत असून कंपनीतील एकूण कर्मचाऱयांच्या संख्येत त्यांची संख्या एकतृतियांश ठरली आहे.
स्वराज ट्रक्टर्ससारख्या कंपनीने आपल्या प्रत्यक्ष कारखान्यातील कामासाठी 62 महिला तंत्रज्ञांची नेमणूक केली आहे. या महिला ट्रक्टर उत्पादनाशी निगडित अशा जुळणी, रंगकाम, तांत्रिक बाबी या महत्त्वाच्या व जोखमीच्या कामांमध्ये उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत. स्वराज ट्रक्टर्सच्या संदर्भातील अन्य महत्त्वाची बाब म्हणजे कंपनी पात्रताधारक महिलांची प्रशिक्षणार्थी वा शिकाऊ उमेदवार म्हणून नेमणूक करतात. त्यांना ट्रक्टर उत्पादन क्षेत्रातील विविध विभागांमध्ये प्रशिक्षण दिले जाते व त्यातून निवडक महिलांची तंत्रज्ञ म्हणून कंपनीत नेमणूक केली जाते. कंपनीच्या या धोरणात्मक निर्णयाचे सकारात्मक परिणाम दिसू लागले आहेत.
यासंदर्भात टाटा मोटर्सच्या संदर्भातील उल्लेखनीय बाब म्हणजे कंपनीच्या उत्पादन विभागात विविध कामे करण्यासाठी महिला पण त्यांच्या पुरुष सहकाऱयांच्या बरोबरीने कार्यरत आहेत. यामध्ये कार्यालयीन कामांव्यतिरिक्त असेंब्ली-उत्पादनापर्यंतच्या सर्व विभागांचा समावेश आहे, हे विशेष. टाटा मोटर्समध्ये कुशल कामे करणाऱया महिला कर्मचाऱयांच्या संख्येत 2016-17 पासून उल्लेखनीय वाढ झालेली दिसून येते. परिणामी सध्या टाटा मोटर्समध्ये कंपनी स्तरावर सुमारे 1800 महिला कार्यरत असून त्यामध्ये कंपनीच्या जमशेदपूर येथील कारखान्यातील फिटिंग व इलेक्ट्रॉनिक उपकरण विभागात जवळजवळ 100 टक्के महिला कर्मचारी आहेत. याशिवाय टाटा मोटर्सच्या पुणे येथील कारखान्यात पण 650 महिला कर्मचारी आहेत.
टोयाटो किर्लोस्कर मोटर कंपनीमध्ये तंत्रज्ञान-अभियांत्रिकी याशिवाय उत्पादनाला साहाय्यक अशा सर्वच विभागांमध्ये महिला कर्मचारी आहेत. याशिवाय नजीकच्या भविष्यात कंपनीमध्ये महिलांची संख्या वाढविण्यासाठी योजनापूर्वक प्रयत्न सुरू आहेत. यासाठी कंपनीच्या पुढाकारातून टोयाटो टेक्निकल इन्स्टिटय़ूटद्वारा महिलांना विशेष प्रशिक्षण दिले जात आहे.
तंत्रज्ञान-उत्पादन क्षेत्रातील तज्ञांच्या मते वाहन-उद्योग क्षेत्रात सर्वच प्रकारची कामे करण्यासाठी महिला पुढे येत आहेत. त्यांना संबंधित कंपनी-व्यवस्थापनांची साथ मिळत असून त्याचाच हा परिणाम म्हणावा लागेल. एकूणच तंत्रज्ञान-अभियांत्रिकी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेण्यासाठी महिलांचा कल वाढता आहे तर त्याचवेळी प्रत्यक्ष कारखाना उत्पादन क्षेत्रात जिद्दीने-चिकाटीने व मुख्य म्हणजे कार्यक्षमपणे काम करून या महिला कर्मचाऱयांनी वाहन उत्पादन क्षेत्रात काम करण्यासाठी आपली पात्रता, क्षमता व कार्यक्षमता या सर्वच बाबी सिद्ध केल्या आहेत.
– दत्तात्रय आंबुलकर