वृत्तसंस्था/ जयपूर
बलाढय़ तामिळनाडू व हिमाचल प्रदेश यांच्यात विजय हजारे करंडक स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी येथे होत असून या लढतीत तामिळनाडूचे पारडे जड वाटत असले तरी तुलनेने दुबळे असलेले हिमाचल प्रदेश पहिल्यांदाच या स्पर्धेचे जेतेपद पटकावण्यास उत्सुक झाले आहे. सकाळी 9 वाजता या सामन्याला सुरुवात होणार आहे.
दोन्ही संघांनी अंतिम फेरी गाठताना उपांत्य सामन्यात परस्परविरोधी विजय मिळविले. भारताचा माजी खेळाडू रिषी धवनच्या नेतृत्वाखालील हिमाचलने सेनादलाचा 77 धावांनी पराभव करून अंतिम फेरी गाठली तर तामिळनाडूने रोमांचक सामन्यात शेवटच्या चेंडूवर सौराष्ट्रचे आव्हान 2 गडय़ांनी संपुष्टात आणत अंतिम फेरीत स्थान मिळविले. तामिळनाडूने या मोसमात सईद मुश्ताक अली करंडक स्पर्धा जिंकली असल्याने ही स्पर्धा जिंकून दुहेरी मुकुट साधण्याचा त्यांचा प्रयत्न असेल. आतापर्यंतच्या विविध सामन्यात अष्टपैलू प्रदर्शन करणाऱया तामिळनाडूसाठी वेगवेगळय़ा खेळाडूंनी परफॉर्म केले असून तशाच कामगिरीची अपेक्षा या सामन्यातही केली जात आहे. दक्षिण आफ्रिका दौऱयाहून परतलेल्या बाबा अपराजितने आपला खेळ उंचावत नेला असल्याने तामिळनाडूची बाजू आणखी भक्कम झाली आहे.
त्याचा सलामीचा जोडीदार एन.जगदीशनही चांगल्या फॉर्ममध्ये असून त्याने कर्नाटकविरुद्ध शतक नोंदवले हेते. उपांत्य सामन्यातील अपयशाची भरपाई करण्याचा तो यावेळी प्रयत्न करेल. बाबा इंद्रजित, अनुभवी दिनेश कार्तिक, कर्णधार विजय शंकर, एम. शाहरुख खान, वॉशिंग्टन सुंदर या त्यांच्या फलंदाजात कोणत्याही गोलंदाजी आक्रमणावर हल्ला करण्याची क्षमता आहे. हिमाचलच्या अननुभवी गोलंदाजांना त्यांना रोखण्यासाठी आपली कामगिरी उंचवावी लागेल.
हिमाचलसाठी अष्टपैलू रिषी धवनवर त्यांची मुख्य भिस्त असेल. या स्पर्धेचे पहिले जेतेपद मिळविण्यासाठी त्यालाच आघाडीवर राहून प्रयत्न करण्याची गरज आहे. सलामीवीर प्रशांत चोप्राला गवसलेला फॉर्म ही त्यांच्यासाठी दिलासादायक बाब ठरली आहे. उपांत्यपूर्व व उपांत्य दोन्ही सामन्यात त्याने सामना जिंकून देण्याऱया खेळी (99, 78) केल्या आहेत. मात्र हिमाचल संघ या दोन खेळाडूंवरच जास्त अवलंबून आहे. सामना एकतर्फी होऊ नये यासाठी शुभम अरोरा, दिग्विजय रांगी, अमित कुमार, आकाश वसिष्ठ यांनाही भरीव योगदान देण्याची गरज आहे.