आधी बोर्डवे निवारा केंद्रात, मग मूळ ठिकाणी रवानगी : मालकाला न सांगताच निघाले होते गावी
चंद्रशेखर देसाई / कणकवली:
लॉकडाऊननंतर कामे बंद झाल्याने ठिकठिकाणी कामे करणाऱयांना घरची ओढ लागली आहे. एकीकडे काम नसल्याने हातात पैसा नाही. दुसरीकडे मालक देईल, त्यात भागवावे लागत असल्याने चिरेखाणीवर कामाला असलेल्या मालवण तालुक्यातील हेदूळ भागात चिरेखाणींवर काम करणाऱया 20 जणांनी चक्क पायी चालत विजापूर गाठण्याचा निर्णय घेतला. चालत बोर्डवेपर्यंत आलेल्या या कामगारांची माहिती पोलिसांना मिळताच शुक्रवारी रात्री 2 वाजता त्यांना बोर्डवे येथे ताब्यात घेत तेथील निवारा केंद्रात नेण्यात आले आहे.
या काम्गारांच्या झोपडय़ा, भांडी व इतर साहित्य चिरेखाणींच्या ठिकाणी आहे. मात्र, ‘जेवणाची सोय नसल्याने आम्ही गावी चाललो’, असे त्यांनी महसूल प्रशासनाला सांगितले. शनिवारी तहसीलदार आर. जे. पवार, मंडळ अधिकारी विलास चव्हाण यांनी त्यांची भेट घेत अत्यावश्यक साहित्य दिले. त्यानंतर त्या भागातील मंडळ अधिकाऱयांमार्फत मालकाला सोबत आणत त्यांना पुन्हा चिरेखाणीच्या ठिकाणी पोहोच करत मालकाच्या ताब्यात देण्यात आले.
पोलिसांनी घेतले ताब्यात
शुक्रवारी रात्री दोनच्या सुमारास 20 जण खायला काही नसल्याने गावी निघाले होते. हेदूळ भागातून आलेली ही मंडळी बोर्डवेजवळ आल्यानंतर पोलिसांना माहिती मिळताच पोलीस निरीक्षक शिवाजी कोळी यांनी घटनास्थळी जात त्यांना ताब्यात घेतले. यावेळी तहसीलदार, मंडळ अधिकाऱयांना कळविण्यात आले. मंडळ अधिकारी विलास चव्हाणही पोहोचले. रात्री त्यांना ओसरगाव बोर्डवे हायस्कूलच्या इमारतीतील निवारा केंद्रात थांबविण्यात आले. तेथे आधीच 16 कामगार आश्रयास आहेत. तेथे या 20 कामगारांना तात्पुरत्या स्वरुपात थांबविण्यात आले. मात्र, ते गावी जाण्यास देण्याची विनंती करत होते. मात्र, सद्यस्थितीत लॉकडाऊन असल्याने गावी पाठविता येणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. तसेच रात्री त्यांना सदर शाळेतच थांबविण्यात आले.
मालकाचा शोध लागला
दरम्यान, शनिवारी या कामगारांची मंडळ अधिकारी विलास चव्हाण यांनी चौकशी केली असता ते चिरेखाणीवर काम करणारे असल्याचे समजले. याबाबत तहसीलदार आर जे. पवार यांनीही बोर्डवे येथे भेट देत त्यांना जीवनावश्यक वस्तुंचे किट दिले. मात्र, ते चिरेखाण मालकाचे नाव सांगण्यास तयार नव्हते. याबाबत मालवण तहसीलदारांना कळवून बोर्डवे येथे आलेल्या कामगारांची यादी पोईपचे मंडळ अधिकारी शिंगाडे यांना पाठविण्यात आली. त्यांनी केलेल्या चौकशी खाणमालकही सापडले. चिरेखाणीच्या ठिकाणी त्यांच्या झोपडय़ा असून आवश्यक साहित्यही दिलेले आहे. मात्र, मालकांना न कळविता हे कामगार गावी चालले होते, असे खाणमालकांकडून सांगण्यात आले. या कामगारांना जीवनावश्यक वस्तुंचे सहा किट व 50 किलो तांदूळ तहसीलदारांकडून देण्यात आले. तसेच खाण मालकांना आणून त्यांच्यासोबत या कामगारांना ट्रव्हल्सच्या माध्यमातून मूळ जागी नेत मालकाच्या ताब्यात देण्यात आले. सदर प्रक्रिया पार पाडण्यासाठी वागदे मंडळ अधिकारी विलास चव्हाण, तलाठी सातारकर तसेच पोईप मंडळ अधिकारी शिंगाडे यांनी महत्वाची भूमिका बजावली.
मात्र, सद्यस्थितीत चिरेखाणी सुरू होण्याची शक्यता नाही. लॉकडाऊन किती कालावधीसाठी वाढेल, हे सांगता येत नसल्याने या कामगारांमध्ये थोडीशी भीती निर्माण झाल्याचे दिसत होते. कोणत्याही स्थितीत गावी कसे पोहोचता येईल, याच प्रयत्नात ते कामगार आहेत. कामाच्या ठिकाणी काम नाही, पैसा नाही, अशा स्थितीत थांबून त्यांचे मनोधैर्य खचत असल्याने त्यांना घरची ओढ लागल्याचे दिसून आले. मात्र, लॉकडाऊन उठविले जात नाही, तोपर्यंत ‘राहिले रे दूर घर माझे’ म्हणतच थांबावे लागणार आहे.